सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात झाले. दुर्देवाने त्यांच्या पराक्रमी कारकीर्दबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. त्यांचा इतिहास लोकापर्यंत पोहचवणार असल्याचे प्रतिपादन मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जयंती निमित्त संगम माऊली येथे मावळा फौंडेशन आणि साताऱ्यातील विविध संस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, संग्राम बर्गे, अविनाश बाचल, संगम माहुलीचे सरपंच, उपसरपंच अविनाश कोळपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सातारा ही राजधानी केली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अटकेपार झेंडे लागले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा त्यांनी साम्राज्यात रूपांतर केले, दुर्देवाने त्यांचा इतिहास जास्त लोकांना माहीत नाही तो पोहोचवण्याचे काम करणार आहे. प्रारंभी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळा फौंडेशन, जनता सहकारी बँक, दि गुजराथी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी आणि सातारा शहरातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र गीत झाले. अभिजीत बारटक्के, अजिंक्य गुजर यांनी ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र म्हटला अमर बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले. याप्रसंगी जनता बँकेचे ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड. चंद्रकांत बेबले, रवी माने, संजय माने, जनता बँकेचे सीईओ अनिल जठार, गुजराथीचे व्यवस्थापक सतीश घोरपडे, तुषार महामूलकर, आर.डी.पाटील, जनता सहकारी बँक, गुजराथी सोसायटीचे कर्मचारी वर्ग, माऊली ग्रामस्थ उपस्थित होते.