सातारा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या यशस्वी कार्यकीर्दीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यभरात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत, अशांना अभियान कालावधीत लाभ देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान या निमित्ताने सातारा शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल मोहिते, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
नागरिकांना सर्व सरकारी सेवा थेट आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, या मोहिमेअंतर्गत तालुका स्तरावर सेवा सेतू शिबिरांचे आयोजन केले जाणार असून आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध शासकीय व केंद्रीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी दिला जाईल. महसूल व वन विभागाच्या माध्यमातून 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्याबरोबरच प्रलंबित फेरफार, नवीन सातबारा नोंदी, रस्ते उपलब्ध करणे आणि वन हक्क दाव्यांचा निपटारा जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे.
या अभियानात केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर सामाजिक व क्रीडा उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यातील युवा, विद्यार्थी व नवोदित स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन केले जाईल. तसेच प्रत्येक गावात आणि शहरात सेवा माझे योगदान कार्यक्रमाद्वारे स्वच्छता मोहीम, जलसंधारण, रक्तदान आणि विविध जनजागृती उपक्रम राबवून लोकसहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. अभियानाची सांगता १७ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य 'जनसेवक महाकुंभ' कार्यक्रमाद्वारे होणार आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायतींपासून ते संसदेपर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन विकसित भारताचा संकल्प करतील, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.
पदयात्रा राजवाडा येथून सुरु करण्यात आली होती. पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्यास पुष्पहार अपूर्ण करुन पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेज ग्राऊंडवर मानवी साखळी रांगोळीचे आयोजन करण्यात आले होते . सदर अभियान त 2000 विद्यार्थी, सर्व कला व क्रीडा शिक्षक तसेच उपविभागातील सर्व विभाग प्रमुख कर्मचारी वृंदांसह सहभाग घेतला होता.
जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात; अभियान कालावधीत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील
by Team Satara Today | published on : 17 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा