काँग्रेस भवनमधील बैठकीत पुरोगामी संघटनांचा निर्धार...

लवकरच आंदोलनाची दिशा ठरणार

by Team Satara Today | published on : 21 July 2025


सातारा : राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, संविधानातील तत्त्वांना हरताळ फासत येऊ घातलेले जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेची सक्ती आदी बाबत साताऱ्यातील सर्व पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला.
यासंदर्भात  सुकाणू समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात अध्यक्ष रणजीत सिंह देशमुख, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या विशेष उपस्थितीत जिल्ह्यातील चाळीस पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रतिनिधीची आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.
 राज्यातील सरकार हे मनुवादी आहे .बहुजन समाजात फूट पाडून जनतेच्या कळीच्या प्रश्नांना बगल देत हे सरकार चलाखी करत आहे. अलीकडेच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना झालेली मारहाण, विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या समर्थकांची झालेली मारामारी , आमदाराकडून  उपहारगृह कर्मचाऱ्याला झालेली मारहाण या गोष्टी पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करीत राज्य सरकारने सत्तेवर राहण्याचा अधिकारच गमावला असल्याचे  अनेक वक्त्यांनी सांगितले.
भाजप प्रणित सर्व फ्रंटल संघटना  राज्यात अनेक भावनिक बाबींना खतपाणी घालून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूलभूत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा मोठा डाव यामागे आहे. राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली आहे. शेतकरी  कर्जाच्या खाईत लोटला आहे.   पावसामुळे खरीप हंगामाचे  नियोजन कोलमडले आहे. उपेक्षित - कष्टकरी लोकांच्या तर तोंडाला पाणी पुसली जात आहेत .अशा काळात राज्य सरकार मात्र अस्मितेच्या प्रश्नांना फुंकर घालत आहे. या साऱ्याला विरोधाची सुरुवात सातारा जिल्ह्यातूनच व्हावी, असे स्पष्ट करून सातारा ही भारतात सर्वप्रथम रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांची राजधानी आहे . इंग्रज सरकारच्या विरोधात यशस्वी लढा देत प्रतिसरकार निर्माण करणारी भूमी आहे. जिल्ह्याची ही दैदिप्यमान परंपरा लक्षात घेऊन या जिल्ह्यातूनच राज्यातील महायुतीचे हे जालीम सरकार सत्तेवर ठेवायचे नाही याचा निर्धार व्हायला हवा, अशा शब्दात अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लैंगिक कामगारांच्या हक्कांबाबत जाणीव जागृतीसाठी कार्यशाळा
पुढील बातमी
‘अजिंक्यतारा’ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार प्रदान

संबंधित बातम्या