सातारा : शिक्षण तर महत्वाचे आहेच पण, भावी पिढी सक्षम घडण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला, वक्तृत्व, लेखन आदी विषयांमध्येही पारंगत केले पाहिजे. उद्याचा नागरिक सुशिक्षित आणि सक्षम होण्यासाठी बाल वयातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा पंचायत समितीमार्फत सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वक्तृत्व, निबंध व चित्रकला या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पाहता सर्व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी, तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास साधावा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना केले.
यावेळी प्राध्यापक विक्रम कदम यांचे स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झाले. श्रीमती जयमाला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती जयश्री शिंगाडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला अजित साळुंखे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.