नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली. केंद्रीय कर्मचारी ज्या निर्णयाचा प्रतिक्षेत होते, तो निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन् कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. हा महागाई भत्ता दोन टक्के वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता (DA) (DR) 53 टक्क्यांवरुन 55 टक्के झाला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ यापूर्वी जुलै 2024 मध्ये झाली होती. तेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. तेव्हा तीन टक्के वाढ झाली होती. आता दोन टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात टक्के टक्के अधिक महागाई भत्ता जोडला जाईल. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी मानली जाईल. महागाई भत्त्याच्या वाढीमुळे करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल.
किती वाढणार पगार
जर एखाद्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये असेल, तर 53% DA नुसार त्याला 26,500 रुपये महागाई भत्ता मिळेल. परंतु 55 टक्के DA नुसार त्याला 27,500 रुपये DA मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात एक हजार रुपयांची वाढ होणार आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन 70 हजार रुपये असेल. तर त्याच्या मूळ पगारावर महागाई भत्ता ₹ 37,100 असेल. परंतु 55 टक्के डीएनुसार, महागाई भत्ता ₹ 38,500 असेल. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात ₹1,400 ने वाढ होईल.
मूळ वेतन ₹ 1,00,000 असलेल्यांना 53 टक्के डीए दराने ₹ 53,000 महागाई भत्ता मिळत असे, परंतु आता त्यांना 55 टक्के दराने ₹ 55,000 डीए मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात मासिक 2 हजार रुपयांची वाढ होणार आहे.
यापूर्वी 3 ते 4 टक्के महागाई भत्ता वाढत होता. परंतु 78 महिन्यात पहिल्यांदाच महागाई भत्ता केवळ दोन टक्के वाढला आहे. यापू्रवी 2018 मध्ये महागाई भत्ता दोन टक्के वाढला होता. त्यानंतर सलग तीन ते चार टक्के महागाई भत्ता वाढला होता.