सातारा - लोकाभिमुख, परिवर्तनवादी संत कबीर व तुकाराम यांच्यावरील सूक्ष्म तुलनात्मक संशोधनाच्या अभ्यासाने मला नवीन दृष्टी मिळाली व कविता लेखनाने समृद्ध केले, असे मत कवयित्री व संशोधक डॉ. मानसी विजय लाटकर यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने 'मी आणि माझे लेखन 'या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या वर्षातील थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष प्रा.प्रशांत साळवे, सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव व कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे उपस्थित होते.
डॉ. मानसी लाटकर म्हणाल्या, सत्यशोध हीच माझ्या संशोधन कार्याची व कविता लेखनाची प्रेरणा आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचा मोठा परिणाम झाला.जीवनाला परिवर्तनाची दिशा मिळाली. आंतरजातीय लग्नाने विजय सारखा चांगला जीवनसाथी मिळाला. आई-वडिलांचा पाठिंबा व चांगला कौटुंबिक वारसा यामुळे रक्तातील संवेदनशीलता याने कवितेत सामाजिक जाणीवांचा आविष्कार झाला. माझ्या कवितेने जिवंत राहण्याची प्रेरणा व जगण्याचं शहाणपण दिले. हरवलेली संस्कृती कळू लागली.
डॉ. मानसी लाटकर यांची कन्या मनस्विनी हिने सर्व वक्त्यांची भाषणे ऐकत चित्रे काढून त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्द्यांच्या निर्देशाचा अविष्कार प्रत्येक वक्त्याच्या चित्रांमध्ये केल्याबद्दल तिचा व पिताजी विजय लाटकर यांचा सत्कार संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश इंजे यांनी केले. डॉ.सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. प्रशांत साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशपाल बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.