देवापूर : माण खटाव तालुक्याचे युवक नेतृत्व म्हणून अनिल देसाई यांची संपूर्ण जिल्हाभर ओळख आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून ते अनेक वर्षे तालुक्याचे नेतृत्व करत आहेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला बळकटी देण्याचे कार्य त्यांच्या हातून निश्चित होईल. बेरजेचे राजकारण करुन जिल्हा राष्ट्रवादीमय करणार असून अनिल देसाई यांच्या रुपाने माणमध्ये पक्षाला युवा नेतृत्व पक्षाला मिळतेय ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, खा. नितीन पाटील यांनी केले.
दहिवडी, ता. माण येथे माण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे, किसनवीर कारखाना संचालक संदीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.
खा. नितीनकाका पाटील म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपणार्या अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरु असणारी वाटचाल निश्चितपणे बळ देणारी आहे. अनिल देसाई यांना ताकद देण्याचं काम करु हाच विश्वास देण्यासाठी माणमध्ये आलो आहे. येणार्या संपूर्ण निवडणुका मोठ्या ताकदीने लढण्यासाठी अनिल देसाई यांच्या पाठीशी असणारी युवकांची फळी स्वाभिमानी कर्तृत्वान असल्याचा अभिमान आहे. अनिल देसाई यांच्या सारखं युवक नेतृत्व पक्षाला मिळतेय ही आनंदाची बाब आहे. सर्वच फळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची केलेली मागणी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय पक्ष वाढीसाठी निश्चित फायद्याचा ठरेल. या पुढे कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अनिल देसाई म्हणाले, गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटात प्रवेशाची मागणी जोर धरत होती. त्या अनुषंगाने आजचा संवाद दौरा खा. नितीन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून आपल्या भावना मांडल्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी काम करत होतो. त्यामुळे ना. अजितदादांची कामाची पद्धत जवळून पाहता आली. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम अजितदादा सातत्याने करत असतात.
गेली 30 वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात कार्यरत असताना कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात यशस्वी ठरलो म्हणून कार्यकर्त्यांची मांदियाळी या ठिकाणी पहावयास मिळते. ना. अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.