खटाव : मी गेल्या 16 वर्षांपासून सत्तेविरोधात संघर्ष करत आलो आहे. माझ्या विरोधात अनेक षडयंत्रे रचण्यात आली पण कधी कुणापुढे झुकलो नाही. आता माझ्या विरोधात षडयंत्रे रचणारे सगळे सावज टप्प्यात आले आहेत. कुणी काय काय उद्योग केलेत याचे सगळे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे माझ्या विरोधातील षडयंत्रात सहभागी असणार्या सर्वांचाच कार्यक्रम लागणार असल्याचे वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याने सातारा व सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बिदाल येथे एका कार्यक्रमात बोलताना ना. जयकुमार गोरे यांनी 2017 साली घडलेले एक प्रकरण पुन्हा उकरुन काढून विरोधकांनी रचलेल्या षडयंत्राबाबत प्रथमच सविस्तर भाष्य केले. ना. गोरे म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील मी राजकारणात आलो, आमदार झालो हे अनेकांना कधीच पटले नाही. आता तर मी राज्याचा मंत्री झालो, त्यातही आणखी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झालो हे विरोधकांना रुचलेच नाही.
मला विठूरायाच्या नगरीची सेवा करायची आणि आषाढी वारीचे नियोजन करायची संधी परमेश्वराने दिली आहे. मला इतके सगळे मिळाले आहे, मात्र विरोधकांना मला आनंद मिळूच द्यायचा नाही असे ठरवले आहे. त्यामुळेच माझ्या विरोधात निवडणुकीपूर्वी, निवडणूक झाल्यावर, मंत्रीपद मिळू नये म्हणून आणि मंत्रीपद मिळाल्यावरही षडयंत्रे रचण्यात आली. मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले. परमेश्वर आणि जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठिशी असल्याने हा छत्रपतींचा मावळा सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय ठेवून ठामपणे उभा आहे. माझ्या विरोधकांच्या औलादी मर्दाच्या नाहीत. मैदानात लढण्याची त्यांच्यात धमक नाही. ते पळपूटे आहेत म्हणूनच माझ्या विरोधात गेली 16 वर्षे षडयंत्रे रचली जात आहेत. एक तर मी कुणाच्या वाटेला जात नाही. विनाकारण माझ्या वाटेलाही कुणी यायचे नाही, मात्र कुणी आलाच तर त्याला मी सोडत नाही. मी सावज टप्प्यात आल्याशिवाय काही करत नाही.
आता सगळे सावज टप्प्यात आले आहेत. आता त्यांची पळापळ सुरु झाली आहे. मी नव्हतोच, माझा काही संबंध नाही, मी षडयंत्रात सहभागी नाही असे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे, पण सगळ्यांचा हिशोब आणि पुरावे आले आहेत. कोण कुठे आणि कुणाबरोबर बसला, कुणाशी बोलला, कुणाला सोबत घेतले, कुणाला किती पैसे द्यायचे ठरले याची आणि आणखी महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे षडयंत्रात सहभागी सगळ्यांचा कार्यक्रम लागणार आहे.
ना. गोरे पुढे म्हणाले, कुणी कितीही काळ्या बाहुल्या बांधल्या, कितीही षडयंत्रे रचली तरी मी माझ्या उद्दिष्टपूर्तीकडे जाणारच आहे. मी आजपर्यंत खूप सहन केले आहे. परमेश्वराने मला सहन करण्याची ताकद दिली आहे. विरोधकांनी फक्त एक टक्का सहन करुन दाखवावे. त्यांनी एकदा माझ्याबरोबर मैदानात येवून लढावे. मी सर्वसामान्य कुटुंबातून मोठ्या संघर्षाने पुढे आलो आहे. जनतेने मला चार वेळा आशिर्वाद दिले आहेत. मला इतिहास आणि भूगोल नव्हता. आमचा इतिहास आम्हीच लिहायला सुरुवात केली, पण ज्यांचा पूर्वजांचा इतिहास आहे. त्यांनी तो टिकवण्याचा प्रयत्न करावा. पूर्वजांच्या पुण्याईवर असणार्यांनी षडयंत्रे रचण्याचे उद्योग बंद करावेत. षडयंत्रे रचणारे आजपर्यंत कधीच युध्द जिंकले नाहीत. त्यांचा आसुरी आनंद क्षणिक असतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री जयकुमार यांच्याशी संबंधित 2017 मधील एका प्रकरणावरुन गेल्या दोन महिन्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत अनेक वक्तव्ये केली होती. राज्यातील बड्या राजकारण्यांचा ना. गोरेंच्या विरोधातील षडयंत्रात सहभाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या प्रकरणावरुन काही जणांना पोलिसांनी अटकही केली आहे. आता जयकुमार गोरेंनी आणखी काही जणांविरोधातील पुरावे हाती लागले असून त्यांचाही कार्यक्रम लागणार असल्याचे वक्तव्य केल्याने सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.