हिंदी सक्तीपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणात वापर वाढवा

शरद पवार यांची केंद्र सरकारकडून अपेक्षा

by Team Satara Today | published on : 26 June 2025


सातारा : प्राथमिक शिक्षणामध्ये लहान मुलांच्या भाषा संदर्भाचे ज्ञान आणि आत्मसात करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदीची भाषा शक्ती नको. त्यापेक्षा केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भाने शिक्षण अभ्यासक्रम आणि त्याचे विकसन याबाबतचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील; याबाबत लवकरच एकत्रित निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.

शरद पवार गुरुवारी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामुळे सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. केबीपी कॉलेजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम शुभारंभ व सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राची पाहणी या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

ते पुढे म्हणाले, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील हे सांगणे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची नको. सरकारने पाचवी पर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा. त्या ऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये समावेश करून त्या संदर्भाने कोणत्या अभ्यासक्रम विकसित करता येतील त्याबाबत विचार करावा. हिंदी सक्तीपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता ही मुलांसाठी महत्त्वाची आहे. त्याचे शिक्षण मुलांना मिळावे. त्यासंदर्भात विशिष्ट प्रक्रिया विकसित करणे याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. केंद्र शासनाने या बुद्धिमत्तेला मान्यता दिली असून राज्य शासनानेही यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर एआय चा वापर व्हायलाच हवा. त्यामुळे शेतकर्‍यांचे ओझे कमी होईल.

रयत शिक्षण संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी पुढाकार घेतला आहे. हिंदी भाषेची सक्ती नको. भाषा कोणतीही प्रवाही असते. मात्र त्या संदर्भातले निर्णय ऐच्छिक असावेत. प्राथमिक शिक्षणामध्ये त्याची सक्ती केली जाऊ नये, असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, याबाबत एक प्राथमिक बैठक तिन्ही घटक पक्षांची झाली आहे. या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील. काही ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणे पाहून परिस्थिती सापेक्ष निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.

ठाकरे गटाच्या स्वतंत्र भूमिकेविषयी बोलताना आपण या संदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. इराण इस्त्राईलयुद्ध संघर्षामध्ये भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असेही पवार ठामपणे म्हणाले. शक्तिपीठ मार्गाला सांगली व कोल्हापूर येथील शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात आपली काय भूमिका आहे, या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले हा प्रकल्प काय आहे ? तो मी समजावून घेईल. राज्य शासनाने याबाबतची माहिती दिली तर ती घेतली जाईल. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. विकासामध्ये विरोधासाठी विरोध नको. त्याचे अन्वयार्थ समजून मगच मी यावर भाष्य करेन, असे पवार म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शुभांशू 28 तास प्रवास करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले
पुढील बातमी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडी, व्याख्यान, रॅली उत्साहात साजरी

संबंधित बातम्या