नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी चा भीषण स्फोट

पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे शहीद, तर अनेक पोलिस जखमी

by Team Satara Today | published on : 09 June 2025


छत्तीसगड : गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध तीव्र मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. यामुळेच अनेक जिल्ह्यांमधून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात आला आहे. दुसरीकडे, या कारवाईने संतप्त झालेल्या नक्षलवाद्यांनी आज एक मोठी घटना घडवून आणली आहे. 

सोमवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोट झाला. या घटनेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (कोंटा विभाग) आकाश राव गिरीपुंजे शहीद झाले आहेत, तर अनेक पोलिस जखमी झाले आहेत. ही घटना दोंड्रा गावाजवळ घडली. जखमींना कोंटा रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, ही घटना नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या गस्तीदरम्यान घडली. 

सीपीआय(एम) ने १० जून रोजी भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या कोणत्याही घटनेला रोखण्यासाठी एएसपी आकाश राव गिरीपुंजे परिसरात पायी गस्त घालत होते. यादरम्यान आयईडीचा स्फोट झाला, ज्यात आकाश राव गंभीर जखमी झाले, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात शोध मोहीम वाढवली आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शामरा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केले. ते म्हणाले, एएसपी आकाश राव एक शूर सैनिक होते. त्यांना अनेक शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. हा आमच्यासाठी दुःखद क्षण आहे. 

यापूर्वी ६ जानेवारी २०२५ रोजी विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या हल्ल्यात ९ जण शहीद झाले होते, ज्यात ८ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालकाचा समावेश होता. हा हल्ला ६०-७० किलो वजनाच्या आयईडीने करण्यात आला होता, जो गेल्या दोन वर्षात राज्यातील सुरक्षा दलांवर झालेला सर्वात मोठा हल्ला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे
पुढील बातमी
समुद्रात मालवाहू जहाजाला आग

संबंधित बातम्या