सातारा : सातारा नगरपरिषद कडून शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अंतर्गत ही जाहीर नोटीस देण्यात आली असून, अतिवृष्टी, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारती किंवा मिळकती धोकादायक अवस्थेत आहेत, त्यामध्ये कोणीही वास्तव्य करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित घरमालक किंवा भोगवटाधारकांनी अशा इमारती किंवा त्यांच्या धोकादायक भागांचे तात्काळ विसर्जन (उतरवणे) करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या सूचनेचे पालन न केल्यास आणि धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास संबंधित मालक किंवा भोगवटाधारक जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. ही नोटीस मुख्याधिकारी विनोद जळक यांनी जारी केली आहे.