हिंदी सक्तीबाबत राज्य सरकार बॅकफूटवर

जाधव समितीच्या अहवालानंतर निर्णय; मोर्चा रद्द, ठाकरेंची विजयी सभा होणार

by Team Satara Today | published on : 29 June 2025


मुंबई : त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेबाबत राज्य सरकारने यापूर्वी काढलेले दोन्ही जीआर रद्द करत असल्याबाबतची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि. 29 रोजी केली आहे. यासंदर्भामध्ये डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. असे असले तरी सरकार हरले, मराठी माणूस जिंकला... 5 जुलैला मोर्चा नाही तर विजयी सभा धडाडणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हिंदी भाषा सक्तीच्या धोरणामुळे राज्य सरकारला जनतेचा तसेच विरोधी पक्षांचाही रोष पत्करावा लागल्यानंतर त्यांनी याबाबत एक पाऊल पाठिमागे घेत डॉ. नरेंद्र जाधवांच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलेला आहे. हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावर शिवसेना उबाठा चे सुप्रिमो उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच विरोधी बाकावरील इतर छोट्या-मोठ्या पक्षांनीही हिंदी सक्तीबाबत सरकारविरोधात मोर्चाची तलवार उपसल्यानंतर राज्य सरकारची पाचावर धारण बसली होती. 

येत्या 5 जुलैला राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार होता. यामध्ये राज्यातील शेकडो सामाजिक, साहित्यिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होणार होते. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देणे आणि दुसरीकडे अशाप्रकारचे आदेश काढून हिंदी भाषा लादणे या राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे जनसामान्यांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला होता. यामध्येच विरोधक सरकारविरोधात यासंदर्भात आग ओकत असताना भाजप तसेच मित्रपक्षातील अनेक दिग्गज मात्र याबाबत सावध भूमिकेमध्ये होते. 

दरम्यान, आज दि. 29 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्राचे दोन्ही अध्यादेश रद्द करीत असल्याबाबत घोषणा केली. तसेच यासंदर्भामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमणार असून या समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेवू, असेही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मोर्चाला कोणीही अडवले नाही, याबाबत विरोधकांनी चर्चा करावी. आम्ही त्यांना उत्तर द्यायला तयार आहोत. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी मुले महत्त्वाची आहेत. विद्यार्थी केंद्रित अशीच आमची भूमिका आहे. राज्यात त्रिभाषा सूत्र लागू न केल्यास आपल्या मुलांना अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट नुसार गुण मिळणार नाहीत. त्यामुळे ती मुले मागे पडतील. मात्र, इतर भाषांच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतील, असेही फडणवीस म्हणाले.

सरकार हरले, मराठी माणूस जिंकला. आपल्यावर या सरकारने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही या महायुती सरकारचा अजेंडा उधळून लावला. 5 जुलैला मोर्चा होणार नसला तरी मुंबईत विजयी सभा धडाडणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने इंदापूर येथे वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
पुढील बातमी
किल्ले रायरेश्वर कडे जात असताना पर्यटकाचा मृत्यू

संबंधित बातम्या