मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

by Team Satara Today | published on : 20 August 2025


सातारा : राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.


मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी या भेटी वेळी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण परिस्थितीची माहिती घेऊन पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे, पिकांचे नुकसान आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची माहिती घेतली. आवश्यक तेथे राज्य आपत्ती प्रतिसादात दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.


अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी करावे. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. यासाठी प्रशासनाने वेगाने कारवाई करावी, आशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


पावसामुळे बाधित होणाऱ्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अतिवृष्टी काळात विशेषतः नद्या, धरणे व पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हवामान विभागाशी सतत संपर्क साधून येणाऱ्या पावसाचा अंदाज जनतेपर्यंत वेळीच पोहचवण्यात याव्यात असेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.


राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, मदत व बचाव कार्य या विषयी माहिती दिली.


अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील विविध जिल्ह्याचा आढावा घेत असताना मंत्री मकरंद पाटील यांनी  सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाटण,कराड ,सातारा येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. धरणातून विसर्ग करण्यात आल्याने नदीलगतच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी/खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
उपोषणास बसलेल्या गणेश पवार यांना जाहीर पाठिंबा : इम्रान मुल्ला

संबंधित बातम्या