कोरेगाव : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत प्रमाणित सोयाबीनचे बियाणे मोफत वाटण्यात येत आहे. मात्र, हे मोफत बियाणे वाटण्यासाठी महाबीजने नेमलेले दुकानदार आडमुठेपणा करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे देण्याची योजना आणली आहे. ही योजना शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने व महाबीजच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सांगितलेले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे मागणीचे फॉर्म ऑनलाइन भरून मागणी केली. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार सोयाबीन बियाणे मंजूर केले. मंजूर बियाणे वाटपासाठी ‘महाबीज’ने विभागवार दुकानांची निवड केली आहे. निवड केलेल्या दुकानांतून धान्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते.
त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्या दुकानाशी संपर्क साधून मंजूर झालेल्या सोयाबीन बियाणेची मागणी केली असता त्यांना २२ किलोची एक बॅग आणि प्रत्येक शेतकऱ्याला दोन बॅगा मिळतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना ४४ किलोंच्या वर बियाणे मंजूर झालेले आहे; परंतु संबंधित दुकानदार वरचे बियाणे न देता केवळ ४४ किलो बियाणे देत आहेत. मंजूर झालेले अधिकचे बियाणे हवे असेल, तर मंजूर बियाणे सोडून त्यावरील बियाणे विकत घ्यावे लागेल, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
दरम्यान, याबाबतीत काही शेतकऱ्यांनी कोरेगाव तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने संबंधित दुकानदाराला शेतकऱ्यांना मंजूर सोयाबीन बियाणे विनातक्रार देण्यासंदर्भात दूरध्वनी करून सांगितले. मात्र, संबंधित दुकानदाराने कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली म्हणून संपूर्ण बियाणे देण्यास नकार देत माझ्याकडे बियाणे नाही, तुम्ही रहिमतपूर येथून बियाणे घ्या, असे उद्धटपणे सांगितल्याचे एका शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याबाबत कोरेगाव तालुका कृषी अधिकारी श्री. जाधव यांना विचारता त्यांनी आपण दुकानदारांना मंजूर बियाणे विनातक्रार शेतकऱ्यांना त्वरित देण्याच्या सूचना केल्याचे सांगितले. मोफत सोयाबीन बियाणे व बियाणे वाटपासाठी दुकानांची निवड व नियंत्रण हे काम संपूर्णतः महाबीजकडे असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
कोरेगाव तालुक्यात १९४ शेतकऱ्यांना आठ हजार ५०७.२५ किलो सोयाबीन बियाणे मंजूर झाले असून, त्यातील सात हजार ५४२ किलो बियाण्याचे वाटप पूर्ण झाले आहे. अद्याप २५ शेतकऱ्यांना ९६५.२५ किलो बियाणे वाटप करणे बाकी आहे.