फलटण : नागरिकांना समस्या घेऊन जनता दरबारात तक्रार करण्याची वेळच येऊ नये, हेच प्रशासनाचे आदर्श काम असले पाहिजे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे. भविष्यात जनता दरबार भरवूनही एकही तक्रार अर्ज दाखल झाला नाही, तर तोच आपल्या कामाचा खरा आनंदाचा क्षण असेल, असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
शहर व तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित शासकीय समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराजा मंगल कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ते बोलत होते. या जनता दरबारात बहुतांश अर्जांवर जागेवरच निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आ. सचिन पाटील म्हणाले, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्राप्त अर्जांवर केवळ कार्यवाही न करता समस्यांच्या मुळाशी जाऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रांताधिकारी प्रियांना आंबेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, माजी जि.प. सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, राज खरडेकर, सभापती शिवांजली भोसले उपस्थित होते.
प्रशासनाने काम असे करावे की, नागरिकांना जनता दरबारात तक्रार करण्याची वेळच येऊ नये - रणजितसिंह निंबाळकर, फलटण येथे जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा