मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. मुंबई अन् पुण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाच तासांतच 200 मिमी पाऊस झाला आहे. पुण्यातही 125 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अजूनही मुंबईत कमी वेळेत अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र बुधवारपेक्षा त्याची तीव्रता कमी असणार आहे.
मागील 24 तासांत मुंबईतील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणी 250 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. पालघरमध्ये गुरुवारी काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एक दोन ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.
पुण्यात पुन्हा ऑरेंज अलर्ट
पुण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. अजून पुढचे दोन दिवस महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट दिला आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तळकोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र पाऊस सुरु आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यत 104 टक्के पाऊस झाला आहे. एकूण 3488 मिलिमिटर पावसाची आतापर्यत नोंद झाली आहे.
उजनी धरणातून विसर्ग : उजनी धरणाच्या वरील साखळीमधील सर्व धरणे काठोकाठ भरली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होते आहे. यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले आहेत. सध्या उजनी धरण 109 टक्के क्षमतेने भरले आहे. उजनीत 122 टीएमसी इतका पाणी साठा आहे.