सातारा : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये तीन महिन्यामध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून लेखी आश्वासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांनी दिले.
येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य युवाशक्ती ग्रामविकास संघटनेतर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यास अखेर यश आल्याने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याबाबत युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची मागणी होती. शेवटी धरणे-आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद प्रशासनाकडुन युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या मागण्या मान्य करत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पुढील तीन महिन्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी विविध संघटनेच्या मान्यवर,पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलनस्थळी येवुन जाहीर पाठींबा दिला होता. शिवाय,जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी-पदाधिकारी यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने युवाशक्ती ग्रामविकास संघटनेतर्फे संस्थापक-अध्यक्ष इमरान पठान, जिल्हाध्यक्ष सुनिल कदम, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात तरडे, जिल्हा सचिव तेजस चव्हाण आदी पदाधिकारी यांनी आभार मानले आहेत.