सातारा: सातारा शहरासह परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळच्या सुमारास गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. हलक्या ते मध्यम वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. तसेच शहर व परिसरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही काळासाठी शहरातील वाहतूकही विस्कळित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गारांच्या सरीमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांना फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विशेषत: काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे. तसेच जिल्ह्यातील वीटभट्टी व्यावसायिकांनाही सोमवारच्या पावसाचा मोठा फटका बसला असून तयार वीट भिजल्याने वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.