सातारा : येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या (वाय. सी.) वसतिगृहातून उडी घेत विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येचे पडसाद गुरुवारी महाविद्यालय परिसरात उमटले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या आवारात जोरदार निदर्शने केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल नेमके का उचलले, यामागील कारणांचा पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. संबंधित शिक्षिकेकडून विद्यार्थिनीवर कोणताही मानसिक दबाव होता का, याचीही पडताळणी तपास यंत्रणांनी करावी, असा सूर यावेळी उमटला. तसेच इतक्या संवेदनशील घटनेनंतरही महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन वस्तुस्थिती मांडण्यात हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दोषींवर तातडीने कडक कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वाय. सी. कॉलेजमधील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण : सखोल चौकशीच्या मागणीसाठी 'अभाविप' आक्रमक; कॉलेज परिसरात जोरदार निदर्शने
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा