सातारा : धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी दोन्ही महाराज फ्रंटफूटवर येवून काम करत आहेत. त्यामुळे आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न कुणी करु नये. जयंत पाटील यांना त्यांच्या घरातच कुणी विचारत नाही, असे मी बोललो तर चालेल का? असा प्रति सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी निश्चित केली असून महायुतीतील सर्व घटकांनी ती एकमताने स्वीकारली आहे. त्यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील दोन्ही राजे आघाडीवर राहून काम करत आहेत. मी सोलापूरमध्ये विविध कामांमध्ये व्यस्त असलो तरी दोन्ही राजेंनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने हाती घेतली आहे. निवडणुकीत फ्रंट फूटवर राहून ते काम करत आहेत.
आ. जयंत पाटील यांनी धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीबाबत साताऱ्यातील दोन्ही राजांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना ना. गोरे म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते म्हणून विरोधकांच्या गोटात काही मतभेद आहेत का, हे शोधण्याचे काम जयंत पाटील करत आहेत. मात्र, महायुतीत कोणताही वाद नाही. त्यांनी केलेले दावे वस्तुस्थितीपासून दूर आहेत.
"मी जर जयंत पाटील यांच्याबाबत त्यांच्या घरातच त्यांना कोणी विचारत नाही, असे वक्तव्य केले तर ते योग्य ठरेल का? याचाही त्यांनी विचार करावा," असा टोला गोरे यांनी लगावला. जयंत पाटील हे अनुभवी आणि कसलेले राजकारणी आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या तंबूत काही वाद निर्माण होतो का, याचा ते शोध घेत असतील; मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.