सातारा : सातारच्या साहित्यक्षेत्राला संजीवनी देणाऱ्या मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या १३ वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. मसाप शाहूपुरी शाखेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून कराडचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना श्री.छ.थोरले प्रतापसिंह महाराज जीवन गौरव पुरस्कार तर जिल्हयातील विविध साहित्यिकांच्या कलाकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, साहित्य पुरस्कार योजना सातारा जिल्हयातील उत्तम साहित्यकृतींना देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार श्री. छ.थोरले प्रतापसिंह महाराज जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, उत्तम बंडु तुपे कादंबरी पुरस्कार विद्या पोळ-जगताप यांच्या 'बाय ग' या कादंबरीस, प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार पदमाकर पाठकजी यांच्या 'रंग प्रेमाचे- बदलत्या काळाचे' या कथासंग्रहास, बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार निलेश महिगावकर यांच्या 'लास्ट इयरची वही' या कवितासंग्रहास, वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार डॉ. मोहन सुखटणकर यांच्या निसर्गाचे गोड गुपित यौवनस्पर्श भाग १ व २ या साहित्यास जाहीर करण्यात आला आहे. सर्व पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह असे आहे. या पुरस्कारांचे वितरण शाहूपुरी शाखेच्या वर्धापन दिन समारंभात केले जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत यांचा समावेश होता.
जीवन गौरव पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जन्म नोव्हेंबर १९३४ मध्ये औंदुबर (जि.सांगली) येथे झाला ते त्यांचे मूळ गाव. कराडला ते ओगले ग्लासमध्ये नोकरी करत होते परंतु ती बंद पडल्यावर त्यांनी इतरत्र नोकरी केली त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या आणि ते कराडमध्ये भाड्याच्या घरात राहत होते पण त्यांना वारंवार घर बदलावे लागे. शेवटी कंटाळून त्यांनी कराड सोडण्याचा निर्णय घेतला ही बातमी यशवंतराव चव्हाण यांच्या कानावर गेली. त्यांनी श्री. कुलकर्णी यांना बोलवून ते कराड का सोडतात असे विचारले असता त्यांनी घराची अडचण सांगितली त्यावर यशवंतरावांनी राजाभाऊ कोटणीस यांना बोलावून कोयना सोसायटीमध्ये त्यांना एक प्लॉट द्यायला लावला आणि हा साहित्यिक कराडमध्ये राहिला पाहिजे असे सांगितले होते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी त्या प्लॉटचे पैसे नंतर हळूहळू देऊन टाकले. ते कराड येथे झालेल्या २००३ मधील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते मराठीतील वाडमयीन नियतकालिकांकडून त्यांचे कविता आणि लेख प्रसिध्द झाले आहेत. त्यांच्या ललित लेखांचे चार संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पारितोषिक, महाराष्ट्र फौंडेशनचे पुरस्कार, रणजित देसाई पुरस्कार, मृण्मयी पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कराड पुरस्कार मिळाले आहेत. ते गेल्या ६० वर्षांपासून सदानंद साहित्य मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा 'डोह' हा ललित लेख संग्रह पदवी, पदव्युत्तर अभ्यासासाठी नियुक्त, गुजरात राज्य महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या, नवोदित लेखकांना उत्तेजन देणा-या समितीवर तज्ज्ञ परीक्षक म्हणून ते काम करत आहेत. लवकरच या पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.