कोळशाच्या प्रचंड साठ्यासाठी प्रसिद्ध असलेला उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात यरेनियमचा मोठा साठा सापडला आहे. सोनभद्रमधील म्योरपूर ब्लॉकच्या नकटू (Nakatu) येथे तब्बल ७८५ टन युरेनियम ऑक्साईड साठ्याचे ठोस पुरावे सापडले आहेत.
एवढेच नाही तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात १२ राज्यांमध्ये ४७ ठिकाणी युरेनियमचे प्रचंड साठे सापडल्याची माहिती समोर आली होती. हा सर्वात मोठा खजिनाच आहे. भारताची उर्जा निर्मितीची सर्वात मोठी गरज यामुळे पूर्ण होणार आहे.
युरेनियमचा वापर अणुउर्जा निर्मितीसाठी तसेच अण्वस्त्र निर्मितीसाठी देखील केला जातो. यासाठई युरेनियम आपल्याला परदेशातून आणावे लागत होते. आता ते भारतातच सापडल्याने जगावर अवलंबित्व संपुष्टात येणार आहे.
युरेनियमचे हे साठे 'U3O8' श्रेणीतील असून त्यांचा वापर थेट अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून केला जातो.
परमाणु ऊर्जा विभागाच्या (Department of Atomic Energy) थेट देखरेखीखाली नकटू येथे सध्या सखोल उत्खनन आणि सर्वेक्षण सुरू आहे. नकटूच नाही तर परमाणु ऊर्जा विभागाने सोनभद्र जिल्ह्यात इतर ३१ ठिकाणीही युरेनियमचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
सोनभद्र जिल्ह्यातून कोळशाचे उत्पादन केले जाते. आता युरेनियम सापडल्याने भारताची उर्जा राजधानी म्हणून या जिल्ह्याला महत्व प्राप्त होणार आहे.
युरेनियमच्या या मोठ्या साठ्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची सामरिक शक्ती निश्चितच वाढणार आहे. लवकरच याबाबत केंद्र सरकारकडून मोठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.