सातारा : जावली तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था असलेला प्रतापगड साखर कारखाना ऊस पुरवठादार शेतकरी - सभासद आणि कामगार यांच्या लाखमोलाच्या सहकार्यातून अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाने सुरु केला आहे. कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम यशस्वी झाला असून ९२ दिवसांच्या या हंगामात कारखान्याने १ लाख ९१ हजार मे. टन उसाचे गाळप करून अंदाजे सव्वा दोन लाख साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा राहिला असून ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांनी असेच सहकार्य ठेवल्यास आगामी काळात प्रतापगड कारखाना सातारा जिल्ह्यातील अग्रणी कारखाना म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सोनगाव, ता.जावली येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर चालू गळीत हंगामाचा सांगता समारोह व सव्वा दोन लाख साखर पोत्यांचे पूजन अशा संयुक्तीक कार्यक्रमात ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी प्रतापगड कारखान्याच्या संस्थापक संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे,
कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, नामदेव सावंत, दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, रवींद्र परामने, हणमंतराव जाधव, तानाजी शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी संपूर्ण जिल्हात ऊसाचे क्षेत्र कमी होते तरी पण दराची स्पर्धा करून प्रतापगड कारखान्याने सरासरी १८.५८ टक्के रिकव्हरी मिळवून हंगाम यशस्वी केला. कारखाना बंद ठेवणे व्यवहारिक नव्हते. म्हणून कारखाना सुरू ठेवला, यंदा जरी आपण तोट्यात असलो तरी पुढच्या वर्षी मात्र पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून किमान ५ लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, व पुढील हंगाम यशस्वी केला पाहीजे. कारखान्याने दोन हंगामात मिळून एकूण १९ कोटीचे कर्ज फेडले आहे, ही जमेची बाजू आहे. भविष्यात सर्व कर्ज भरून व्याज कमी करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा आहे. कर्मचाऱ्यांच्या अनमोल सहकार्यामुळेच प्रतापगड कारखाना पुन्हा सुरु झाला आहे. स्वर्गीय लालसिंग काकांचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाले आहे. जावली, वाई, कोरेगाव तालुक्यातील उसपुरवठादार शेतकऱ्यांनी आपला ऊस पुरवला त्यांचे आणि सर्व कामगार- कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी मिळून सांघिक पणे एकत्रित काम केले आणि त्याचे फलित म्हणून जावलीतील शेतकऱ्यांचे हक्काचे सहकार मंदिर पुन्हा उभे राहिले. आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे. त्यामुळे पुढील हंगामातही सर्वांनी असेच सहकार्य कायम ठेवावे. आज ना उद्या, पुढील दोन- पाच वर्षात प्रतापगड कारखाना जिल्ह्यातील सर्वात जास्त दर देणारा कारखाना अशी ओळख कारखान्याची झाल्याशिवाय राहणार नाही. कारखान्याचे उत्पन्न्न वाढवण्यावर भर दिला जाईल. संस्था पूर्ण सक्षमपणे उभी राहावी यासाठी आपण सर्वांनी कायम सहकार्य ठेवावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केले.
प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले, बंद पडलेला कारखाना बाबाराजेंच्या साथीमुळे पुन्हा उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या सहकार्याने कारखाना यशस्वी गाळप करू शकला. अनेक अडचणी आल्या पण, बाबराजेंच्या पाठिंब्यामुळे सलग दोन हंगाम कारखान्याने यशस्वी केले. व जास्त गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने गाठले. पुढेही याच पद्धतीने प्रतापगड जिल्ह्यातील अग्रेसर कारखाना म्हणून नावारूपाला आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी हंगामही यशस्वीपणे पार पाडू, असेही शिंदे म्हणाले.