जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 50 टक्केच उपयुक्त पाणीसाठा; उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 04 April 2026


सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत चालला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 50 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये तुलनेने अधिक पाणीसाठा होता. यंदा मात्र अनेक धरण प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी लक्षणीयरित्या घटली आहे. काही मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये तर पाणीपातळी 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. काही ठिकाणी ही टक्केवारी 15 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याने चिंता वाढली आहे.

उन्हाचा तडाखा वाढत चालल्याने पाणी मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील काही धरण प्रकल्पांमध्ये केवळ 11 ते 35 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक असल्याने पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये तुलनेने साठा स्थिर असला तरी उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे त्यावरही ताण येण्याची शक्यता आहे. सिंचनासाठी पाण्याचा मर्यादित वापर ठेवण्याची गरज असून पिक पद्धतीत बदल करावे लागतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रशासनाने अद्याप पाणीटंचाईबाबत ठोस उपाययोजना जाहीर केल्या नसल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पाणी वापरावर नियंत्रण, गळती रोखणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढवणे यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील धरणसाठ्याची घटती पातळी येणाऱ्या काळातील गंभीर पाणी संकटाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. योग्यवेळी योग्य नियोजन न केल्यास साताऱ्याला पाणीटंचाईचे चटके अधिक तीव्रतेने बसण्याची शक्यता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजप आदिवासी मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत संघटन बळकटीवर भर; प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळींचे नेतृत्व कौतुकास्पद – रवींद्र चव्हाण
पुढील बातमी
भोळेवाडी येथे अंगावर वीज पडल्याने शेतकरी जागीच ठार; पत्नी किरकोळ जखमी

संबंधित बातम्या