सातारा : राज्य शासनाने सुरू ठेवलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी आघाडी उभारली आहे. सातारा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी येथील सयाजीराव महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर भव्य मोठा फलक लावून सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मोहिमेला सातारकरांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. येत्या पाच जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला सातारा जिल्ह्यातून मनसेचे हजारो कार्यकर्ते जाणार असल्याचे राहुल पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेतील त्रिभाषा सूत्राला प्रचंड विरोध होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पाच जुलै रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातारा शहरामध्ये सह्यांची मोहीम उत्स्फूर्तपणे राबवली. या मोहिमेला सातारकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. सुमारे एक तासामध्ये तब्बल 3 हजाराहून अधिक नागरिकांनी येथील फलकावर आपली स्वाक्षरी नोंदवून हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध केला. महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार, शहर उपाध्यक्ष वैभव वेळापुरे, अजहर शेख, भरत रावळ, प्रशांत सोडमिसे, मनसे जनहित सेना शहराध्यक्ष संदीप दुधळे, जयसिंग पाटणकर, इमरान शेख, प्रदीप सवांडे, आदित्य कुलकर्णी, मनोहर चव्हाण, संतोष सासवडकर, अभिजीत इंगळे आदी यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनाविषयी बोलताना राहुल पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे माणूस व्यक्त होताना उत्स्फूर्तपणे मातृभाषेतच व्यक्त होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषाच ही पहिलीपासून शिकवली जावी. त्यामध्ये त्रिभाषा सूत्राची सक्ती करणे गरजेचे नाही. भाषा अनासक्तीच्या धोरणामुळेच मराठी भाषेची अवस्था वाईट होत आहे. याबाबत मराठी भाषेचे भोक्ते म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सह्यांच्या सातार्यातील मनसेच्या मोहिमेला सातारकरांनी प्रतिसाद दिला. पत्रकार, व्यापारी, समाज सुधारक, सामान्य सातारकर यांनी उत्स्फूर्तपणे या फलकावर स्वाक्षरी करून राज्य शासनाच्या या धोरणाचा निषेध केला. आंदोलकांनी हात उंचावून या मोहिमेला प्रतिसाद दिल्याबद्दल सातारकरांना मनापासून धन्यवाद दिले.