सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेतकरी सभासदांचा कौल मान्य केला आहे. मात्र सत्ताधार्यांनी कारखाना जिंकला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्याचा अविर्भाव ठेवला आहे. महाविकास आघाडीचे नेते सुद्धा त्याच अविर्भावात वावरत आहेत. सहकारातील निवडणुकीला राजकीय संदर्भ नसतात 9000 सभासदांच्या वारस नोंदी रखडवल्यानेच त्यांना जिंकता आले, अशी कडवट टीका कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सातार्यात केली.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच मनोज घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या एकंदर निकालाच्या प्रकरणावर मी बोलणारच नव्हतो, पण सत्ताधार्यांकडून असा अविर्भाव आणला जात आहे तो खोटा आहे हे सांगण्यासाठी मला बोलावे लागत आहे. या निवडणुकीतील आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. पण सह्याद्री साखर कारखान्याची एकच निवडणूक त्यांनी जिंकली आहे. म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकले, असा त्याचा अर्थ होत नाही. सहकाराची निवडणूक राजकीय पद्धतीने कधीही लढवली जात नाही. सह्याद्री कारखान्याची 53 वर्ष सत्ता एकाच कुटुंबाकडे होती आणि सत्तेचे विकेंद्रीकरण प्रक्रिया राबवली जावी, असा आमचा आग्रह होता. सभासदांनी सुद्धा मेळाव्यात निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहापोटीच आम्ही निवडणुकीत उतरलो होतो.
विद्यमान संचालक आणि चेअरमन यांनी मृत संचालकांच्या 9000 वारस नोंदी जाणीवपूर्वक दाबून ठेवल्या आणि ज्या नोंदी त्यांनी करून घेतल्या ते त्यांच्याच गटातील होते. विरोधी गटातील नोंदी त्यांनी होऊ दिल्या नाहीत, असा आरोप मनोज घोरपडे यांनी केला. मनोज घोरपडे पुढे म्हणाले, मी राजीनामा देतो आणि या सभासदांच्या नोंदी घेतल्यानंतर आपण पुन्हा निवडणूक लाव. मग कारखाना कोणाचा, याचे उत्तर सभासदच देतील, असे खुले आव्हान त्यांनी दिले. कारखाना निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचीच दोन पॅनल पडली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि संबंधितांच्या पॅनलला आम्ही चर्चा करून 21 पैकी नऊ जागा द्यायची तयारी दर्शवली होती. मात्र त्यांना त्या जागा कमी वाटल्या असतील आणि आपली राजकीय ताकद कराड उत्तर मध्ये मोठी आहे, असा विश्वास त्यांना होता. राजकारणामध्ये प्रत्येकाची राजकीय विचारसरणी भिन्न असते. त्यामुळे कदाचित त्यांनी वेगळा विचार केला असेल, अशी टिप्पणी घोरपडे यांनी केली.
या निवडणुकीमध्ये कराड दक्षिण तसेच खटाव कराड उत्तरच्या काही भागातून आम्हाला चांगले मतदान झाले. आमच्या उमेदवारांना आठ हजार मते मिळाली हेही काही कमी नाही. मुळात जिथे निवडणुकीत झाली नाही तेथे आम्ही निवडणूक लावू शकलो आणि अवघ्या काही महिन्यांमध्ये आमच्या पॅनलच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीला संपूर्ण राज्याने नाकारले आहे. दहा हजार सभासद तुमच्या विरोधात आहेत, याचे आत्मचिंतन सत्ताधार्यांनी निश्चित करावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आ. घोरपडे पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सहकाराला राजकीय संदर्भ लावत आहे. त्यांच्या नेत्यांची जनमानसात पत संपली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या माझ्यावर ट्विट करतात. त्यांना सहकारातील कळत असेल तर त्यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करू नये, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांना लगावला. सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांसाठी मोफत साखर देण्याची घोषणा केली होती त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया गेले तीन वर्षे चालू आहे. यात सभासदांचा पैसा व्यर्थ जात आहे. या प्रकरणाची सुद्धा आम्ही संबंधित यंत्रणेकडून चौकशी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.