सातारा : वडूथ-आरळे पुलावर पेट्रोलने भरलेल्या टँकरच्या लाइनरला अतिउष्णतेमुळे अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. टँकरमध्ये पेट्रोल असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच हरी कदम, मदन साबळे, अमोल कदम, निलेश कदम यांच्यासह इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम पुलावरील वाहतूक थांबवून परिसर सुरक्षित करण्यात आला. सुरुवातीला पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पेट्रोलच्या आगीवर पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात येताच मदन साबळे यांनी तातडीने अग्निशमन यंत्र आणून त्याच्या साहाय्याने आग पूर्णपणे विझविली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक तांबे यांनी वाहतूक शाखेचे अधिकारी घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांच्या धाडस, प्रसंगावधान आणि समन्वयामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने परिसरातून सर्व संबंधितांचे कौतुक होत आहे.