सातारा : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगममाहुली परिसरात ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. या वेण्णा-कृष्णा घाटाचा पूर्णत: जीर्णोद्धार करावा, असा प्रस्ताव बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. दादांनीही त्याला तत्वत: मान्यता देत संबंधित खात्याला तातडीने पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, हा प्रस्ताव बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनाही बालाजीकडून सादर करण्यात आला होता. आणि त्यांच्याकडूनही पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे माहुली घाटाचा जीर्णोद्धार लवकरच होणार, अशी अपेक्षा राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली आहे.
संगममाहुली परिसराचे सध्याची परिस्थिती सादर करतानाच या घाटाचा कसा जीर्णोद्धार व्हावा, वृक्षारोपण, आसपासच्या समाधींची देखभाल त्याबरोबर साताऱ्याच्या पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण योजना तसेच पर्यटनवाढ याबाबतचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या सादरीकरणाला पूर्ण वेळ देतानाच तातडीने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पाहणी करून अंमलबजावणीबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सादरीकरणात पर्यावरण रक्षण, इको प्रेंडली बांधकाम आणि पर्यटन वाढ याला केंद्रीभूत ठेवण्यात आले आहे.
ऐतिहासिक संगममाहुली घाट विकासात्मक आराखडा सादर करताना बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संजय कदम, जगदीश खंडेलवाल, विश्वनाथ फरांदे व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज, मंत्री शिवेंद्रराजे-उदयनराजे यांच्याकडूनही सुरू आहे पाठपुरावा
संगममाहुली घाट परिसराचा विकास यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडून गेली कित्येक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी माहुली घाटाच्या जीर्णेद्धाराचा प्रस्ताव बालाजी ट्रस्टने पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही सादर केला आहे. त्यांच्याकडूनही माहुली घाटाच्या जीर्णेद्धारासाठी प्रयत्न सुरू आहेत. चारी बाजूने असेच प्रयत्न झाल्यास लवकरच प्रस्तावाची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा बालाजीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली.
समाधींना सुरक्षितता आणि मंदिरांचे रक्षण
याच परिसरात स्वराज्यविस्तारक व सातारा संस्थापक छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे. लोकवर्गणीतून त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. महाराणी ताराराणी यांच्या समाधीबाबतही काम सुरू आहे. या स्वराज्यरक्षकांच्या समाधीसह धार्मिक मंदिरांचेही रक्षण करण्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.