दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. सोमवारी संसदेकडे काढलेल्या मोर्च्यानंतर दिल्ली पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास जंतर-मंतर परिसर रिकामा करून आंदोलकांना हटवले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांनी काही तासांतच पुन्हा जंतर-मंतरवर परत येत नव्याने स्टेज उभारलं आणि उशिरापर्यंत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे आंदोलनाचे वातावरण पुन्हा तापले आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने CJPचे समर्थक जंतर-मंतर येथे जमा झाले. आंदोलकांनी पुन्हा संघटित होत आंदोलन सुरू केले आणि आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आज पुन्हा संसद मार्चचा निर्धार
CJPचे प्रमुख नेते अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आंदोलन मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्यांनी सांगितले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आंदोलनातील प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत जंतर-मंतर सोडणार नाही. तसेच मंगळवारी पुन्हा एकदा संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्णय कायम असल्याचे त्यांनी सांगितले. दीपके यांच्या मते, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू असून विद्यार्थी, युवक आणि विविध राज्यांतील समर्थक या आंदोलनात सातत्याने सहभागी होत आहेत.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
CJPने केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख आहे. याशिवाय शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशीही आंदोलकांची भूमिका आहे. याच मागण्यांसाठी सोमवारी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान अनेक आंदोलकांनी सुरक्षा बॅरिकेड्सपर्यंत मजल मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संसदेच्या परिसरात मोठा मोर्चा
आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्याने या मोर्चाची देशभरात चर्चा झाली. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या सुमारे 14 वर्षांनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलक संसद परिसरापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 2012 मध्ये निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राजधानीत मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन झाले होते. त्यानंतर संसद परिसराची सुरक्षा वाढवली होती.
हिंसाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू
दरम्यान, संसद मार्चदरम्यान कनॉट प्लेस परिसरातील रीगल सिनेमाजवळ झालेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेची दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. पोलिसांकडून आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपशील गोळा केला जात असून, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आंदोलनाचा पुढील टप्पा महत्त्वाचा
जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाल्यामुळे राजधानीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आज प्रस्तावित संसद मोर्चाकडे केंद्र सरकार, दिल्ली पोलिस आणि विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतली जाते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काही तोडगा निघतो का, यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.