सातारा : हट्टीपणा सगळेच करतात, सगळ्या वयात करतात. चर्चेला राजी नसणं म्हणजे हट्ट असतो. वयाने मोठा असो किंवा छोटा, संवादापासून दूर गेला की हट्ट सुरू होतो. अशा वेळी समोरच्या व्यक्तीने आपले म्हणणे ऐकून घ्यावे, यासाठी काय करता येईल, दोघांमध्ये योग्यप्रकारे संवाद कसा साधता येईल यासाठी पालकांकडून प्रयत्न व्हायला हवेत. कारण पालक आणि पाल्यांमध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. सुजान पालकात्वासाठी तो आवश्यक असल्याचे मत प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
ते येथील जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फाउंडेशन आणि प्रभुणे क्लिनिक यांच्या वतीने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ. नाडकर्णी यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलत होते.
डॉ. नाडकर्णी म्हणाले, पाल्याशी सुसंवाद ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यांच्यात मुलगा मुलगी असा भेद करू नये, कधी कधी त्यांचाही सल्ला घ्यावा अशा अनेक टिप्स पालकांना दिल्या. आपल्या घरात असलेले मूल हे आपल्या वयाचे नाही. मात्र, त्याच्या भावनांचा आपल्या भावनांप्रमाणेच आदर करण्याची गरज आहे. पालकत्व हे आव्हान नाही, आपली क्षमता आणि सहनशीलता वाढवण्यासाठीच निसर्गाने पालकत्वाची निर्मिती केली आहे हे पालकांनी लक्षात घ्यावे. मुलांच्या वाढीच्या, विकासाच्या वयात निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. एखाद्या समस्येचे स्वरूप अवास्तव वाढवू नका आणि त्या समस्येला क्षुल्लकदेखील ठरवू नका. कुठलाही तज्ज्ञ तुमच्या मुलाला तुमच्याएवढं ओळखू शकत नाही. तुम्ही स्वत: मुलांचे निरीक्षण करायला सुरुवात करा, मुलांचा मूड ओळखून त्यांना सांभाळून घेणारे आपणच असतो, हे लक्षात घ्या. लहान मुलं प्रत्येक गोष्ट शिकण्याच्या वयात असतात, त्यांचे गोंधळ वाढवण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित पालकांना केले. पालकांनी मुलांचा भावनिक अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्याला चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी या आपल्यासाठी चुकीच्या असतील, तर त्या पाल्यासाठी चुकीच्या असतीलच असे नसते. कदाचित मुलांसाठी त्या योग्यही असू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कार्यक्रमाच्या प्रारंभी धन्वंतरी पूजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. संकेत प्रभुणे यांनी कार्यक्रमाची माहिती देत डॉ. नाडकर्णी यांची ओळख करून दिली याप्रसंगी डॉ. नाडकर्णी यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळा फाउंडेशनच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सत्कार केला.
प्रुभणे क्लिनिकच्या वतीने डॉ. संदीप श्रोत्री, डॉ.प्रसन्न दाभोळकर यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना विनोद कुलकर्णी म्हणाले, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असून यानिमित्ताने अनेक साहित्यिकांना ऐकायला, पाहायला मिळणार आहे. या संमेलनाच्या पूर्वी अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्याचा प्रारंभ डॉ. नाडकर्णी यांच्या कार्यक्रमाने झाला आहे.
डॉ. नाडकर्णी यांची मुलाखत डॉ.स्वाती श्रोत्री,डॉ.चैत्राली प्रभुणे यांनी घेतली. यावेळी डॉ. प्रसन्न दाभोळकर, डॉ.संदीप श्रोत्री, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी ॲड. चंद्रकांत बेबले, वजीर नदाफ, संजय माने, सचिन सावंत, आरडी पाटील, राजेंद्र चोरगे, डॉ. सतीश बर्गे, साताऱ्यातील पालक वर्ग उपस्थित होता.