सातारा : भारतात समतेचा विचार अनेक वर्षांपासून मांडला जात आहे. परंतू खऱ्या अर्थाने समतेला कायद्याचा आधार देऊन सर्व भारतीयांना समान पातळीवर आणण्याचे ऐतिहासिक काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पूर्ण केले. आज काही वर्णवर्चस्ववादी लोक ही घटनाच उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभा केला पाहिजे, असे उदगार प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज काँग्रेस भवन, सातारा येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, प्रदेश पतिनिधी बाबासाहेब कदम, रफिकशेठ बागवान, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, सातारा शहर अध्यक्षा सौ. रजनीताई पवार, ॲड. दत्ता धनावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र शेलार म्हणाले, डॉ. बाबासाहेबांची घटना म्हणजे समतेचा विचार कायद्यात रूपांतरित करणारी जगाच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. मात्र सध्या या घटनेवर चोहोबाजूनी हल्ले होत आहेत. देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. त्यासाठी समाजातील सर्व लोकांनी एकत्रित लढा उभा केला पाहिजे.
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, जावळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप माने, सौ. रजनीताई पवार, आरबाज शेख, संभाजी उतेकर यांची मनोगते झाली. यावेळी अन्वर पाशा खान, सुभाष कांबळे, अमोल शिंदे, प्राची ताकतोडे, सौ. माधवी वर्पे, सुषमा राजेंघोरपडे, विजय मोरे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. आभार आनंदराव जाधव यांनी मानले.