सातारा : भारत सरकारतर्फे होणाऱ्या जनगणना 2027 साठी देशभरात व्यापक तयारी सुरू करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातही प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जनगणना ही देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय व सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक असून शासनाच्या धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनासाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सन 1872 पासून सुरू झालेल्या जनगणनेतील ही 16 वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना ठरणार आहे. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल माहिती संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे माहिती संकलन प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
जनगणना 2027 ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) : 1 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत होणार आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असेल. या माध्यमातून नागरिक स्वतः घराची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेची माहिती भरू शकतील. 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक आपल्या HLB गटाला भेट देऊन HLO App वर 1 ते 34 प्रश्नांची माहिती संकलित करतील.
दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार असून या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. यावेळी व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय तसेच सामाजिक व आर्थिक बाबींची माहिती नोंदवली जाईल.
सातारा जिल्ह्यातील जनगणना पूर्वतयारीसाठी 4 ते 6 मार्च 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात 27 चार्ज ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट व जनगणना महसूल सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. ग्रामीण भागासाठी तहसीलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी चार्ज ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनगणना सुमारे 5000 प्रगणकांमार्फत करण्यात येणार आहे. या प्रगणकांना व पर्यवेक्षकांना मोबाईल अॅप आणि आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जनगणनेदरम्यान संकलित केलेली सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल व ती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठीच वापरली जाईल, अशी माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व नागरिकांना जनगणना 2027 मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून गणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी दिलेली अचूक माहिती राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.