सातारा : राज्यातील सैनिकी शाळांतून जास्तीतजास्त युवक एनडीएमध्ये जाण्यासाठी या शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन यातील आव्हानांमधील सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या शाळांना येणाऱ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करेन, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
येथील सैनिक शाळेस शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भेट दिली. यावेळी राज्यातील ३८ शाळांची आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी यवतमाळचे खासदार संजय देशमुख, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, सातारा सैनिक शाळेचे प्राचार्य के. श्रीनिवासन यांच्यासह ३८ सैनिक शाळांचे प्राचार्य, पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
सातारा व चंद्रपूर येथे शासकीय सैनिक शाळा, तर राज्यात ३८ सैनिक शाळेत १२ हजार २२४ विद्यार्थी असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले, ‘‘सैनिक शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देशसेवा, देशभक्ती रुजविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या शाळा इतर शाळांपेक्षा वेगळ्या असून, याच्यामागे देशप्रेम, राष्ट्रीयत्वाची भावना जोडली आहे. सैनिक शाळा देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करतात. हे काम करताना त्यांना अनेक आव्हानांचा तसेच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.’’
पीपीई मॉडेल, अभ्यासक्रम, धोरणांची अंमलबजावणी, सर्व सैनिक शाळांसाठी स्वतंत्र बोर्डाची मागणी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव मिळण्यासाठीचे नियोजन असावे, कमांडंट नियुक्तीचे धोरण, स्टाफिंग पॅटर्न, एनसीसी, संस्थांचे सबळीकरण यासारख्या शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठका घेऊन शाळांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
येथील सैनिक शाळेचा अभिमान वाटावा, अशी कारकीर्द कायम राहिली आहे, असे सांगून सातारा सैनिक शाळेचे त्यांनी कौतुक करताना शाळेच्या कामगिरीप्रमाणे काम करण्यासाठी इतर शाळांना याचा उपयोग व्हावा. यासाठी सातारा येथे राज्यातील सैनिकी शाळांची बैठक घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले.