सातारा : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेला जागतिक दर्जाचे बनविण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाची गरज ओळखून एआय आधारित शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी समन्वय साधण्यावर त्यांनी यावेळी विशेष भर दिला.
सातारा येथे आयोजित या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून ते हजारो सेवकांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ आहे. बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या पद्धती बदलत असून विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून न थांबता जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम करणे हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भविष्यातील रोजगार आणि संशोधनाच्या संधी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी रयत संस्था पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जागतिक स्तरावरील नामांकित विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संशोधन आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पवार यांनी नमूद केले. संस्थेची आगामी वाटचाल ही गुणवत्तावाढ, शिष्यवृत्ती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर आधारित असेल, असे संकेतही त्यांनी आपल्या भाषणातून दिले.
याप्रसंगी दिलीप वळसे पाटील यांनी कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या शिक्षण चळवळीचा गौरव केला. कार्यक्रमादरम्यान ‘रयत’ मासिकाचे प्रकाशन, ‘रयत गुणवत्ता विकास आराखडा’ आणि ‘कर्मवीरांचे सांगाती’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रयत मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे आणि संस्थेला मोलाची मदत करणाऱ्या देणगीदारांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अनिल पाटील, विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, चेतन तुपे आणि महेंद्र लाड यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रयतच्या या नव्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाची दारे खुली होणार असल्याची चर्चा आता शैक्षणिक वर्तुळात सुरू झाली आहे.