सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला 22 कोटी 41 लाख रुपयांचा निधी सर्वसामान्यांच्या उपचारासाठी देण्यात आलेला आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिशन मोडवर काम करत येथील तब्बल 51 हॉस्पिटलचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात 17 लाख वीस हजार आयुष्यमान भारत कार्ड तयार असून त्यांचे वाटप सुरू आहे, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आयुष्यमान भारत मिशन जिल्हा अंतर्गत त्यांनी या योजनेची माहिती घेतली. तब्बल 28 शहरांच्या दौर्यानंतर शेटे यांनी सातार्यात दाखल होऊन या योजनेतील सुधारणा आणि जिल्ह्यातील योजनेची परिस्थिती या संदर्भात माहिती घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, राज्यांमध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2031 हॉस्पिटल समावेश करण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेचे 27 लाख 62 हजार लाभार्थी असून पैकी दहा लाख 42 हजार लाभार्थ्यांची कार्ड देण्यात आलेली आहेत. तसेच या योजनेच्या संदर्भाने राज्यात सातारा जिल्ह्याचा पंधरावा क्रमांक असून सतरा लाख वीस हजार आयुष्यमान भारत कार्ड वाटावयाची बाकी आहेत. त्यादृष्टीने सातारा जिल्हा परिषदेने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी हे उद्दिष्ट पूर्तीचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या रोगाच्या इलाजासाठी सर्वसामान्य लोकांना 22 कोटी 41 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात 51 हॉस्पिटल या योजनेच्या पॅनलवर असून आणखी 15 हॉस्पिटल सूचित करण्यात आली आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सीएसआर फंडामधून मिशन संजीवनी योजनेअंतर्गत यकृत, हृदय, किडनी ट्रान्सप्लांट करण्याची व्यवस्था काही हॉस्पिटलच्या केंद्रांवर केली जाणार आहे. त्या योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 95% निधी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. योजनेच्या संदर्भाने नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील त्यांनी 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. सातारा जिल्ह्यातील 51 हॉस्पिटल जी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत समाविष्ट आहेत त्यांची यादी जिल्हा रुग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रदर्शित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टीनेही आखणी सुरू असल्याचे डॉ. शेटे यांनी स्पष्ट केले.