पुणे : ऐन लग्नसराईच्या दिवसांत महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि पुण्यात लाखो रुपयांचे बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. हे पनीर आरोग्यासाठी खूप घातक आहे. बनवाट पनीर म्हणून विकण्यात येणारा हा पदार्थ नेमका काय आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घेऊया.
मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे आयोजित केले जातात. अशावेळी हल्ली लग्नांमध्ये पनीर हा जेवणातील मुख्य पदार्थ असतो. मात्र पनीर हल्ली सोन्याच्या किंमतीत विकले जाते. त्याचमुळं मोठ्या प्रमाणात बनावट पनीरची विक्री केली जाते. चंद्रपुरातही न्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केले आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत हे पनीर जप्त करण्यात आले आहे.
बनावट पनीर म्हणून चीज अनॅलॉग हा पदार्थ विक्री केला जात आहे. लग्नसराईचा हंगाम व उन्हाळा बघता पनीरची वाढती मागणी लक्षात घेता हे घोटाळे केले जात आहेत. कारवाईत जप्त केलेले पनीर जमिनीत पूरुन नष्ट करण्यात आले. चीज अनॅलॉग हा पदार्थ आरोग्यासाठी घातक असल्याचे समोर आले आहे.
बनावट पनीराने आरोग्याला होणारा दुष्परिणाम
बनावट पनीर एकदोनदा सेवन केल्यास हगवण- उलट्या आदींचा त्रास संभवतो. तर, अशाच प्रकारचे पनीर सातत्याने आहारात आल्यास कर्करोग व हृदयविकाराचा धोका देखील संभवतो. लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर रसायनयुक्त व बनावट पनीर खाल्ल्याने दुष्परिणाम संभवतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
चीज अनॅलॉग म्हणजेच पनीर अनॅलॉग
चीज अनॅलॉग हा पदार्थ पनीरप्रमाणेच असतो. त्याची चवदेखील पनीरप्रमाणेच असते. मात्र, यात पनीरप्रमाणे पोषकतत्वे नसतात. कारण यात व्हेजिटेबल ऑइलचा वापर केला जाते. यात कोणत्याही प्रकारच्या डेअरी प्रोडक्ट्सचा वापर केला जात नाही. चीज किंवा पनीर अनॅलॉग बनवण्यासाठी व्हेजिटेबल ऑइल्स, नट्स, सोया, टॅपिओका, फॅट यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो.
चीज अनॅलॉग दूधापासून बनत नाही. शुद्ध पनीरमध्ये असलेल्या पोषक तत्वांची कमी या चीज अनॅलॉगमध्ये असते. त्याची चवदेखील पनीरप्रमाणे नसते. फक्त पनीरसारखाच दिसणारा हा पदार्थ म्हणून त्याची बनावट पनीर म्हणून विक्री केली जाते. हे पनीर आरोग्यासाठी खूप नुकसानदायक असते.