वाट पाहे बाहे निढळी ठेवुनियां हात ।
पंढरीचे वाटे दृष्टी लागलेसें चित्त
सातारा : जगतगुरु संत तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे लाखो वैष्णवांच्या मांदियाळीसह विठ्ठल भेटीच्या ओढीने पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उद्या (सोमवार) दि. 30 रोजी सातारा जिल्ह्याचा निरोप घेवून आपल्या वैभवी लवाजम्यासह सकाळी 11 वाजता धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. आज पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याने सोहळा तब्बल एक तास लवकर पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा बरड मुक्कामी विसावला.
ज्येष्ठ वद्य अष्टमीला लाखो वैष्णवासंगे माहेराच्या ओढीने पंढरीस निघालेला ज्ञानराजांचा पालखी सोहळा मजल दरमजल करत सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी सायंकाळी दाखल झाला. टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरीनामाच्या जयघोषात अखंडपणे वाटचाल करत वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने निघाले आहेत.
पहाटेच्या नगार्याने वारकर्यांना जाग आली आणि वारकर्यांनी स्नानदि कर्मे उरकून घेतली. पहाटे पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांच्या हस्ते माऊलींची विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 1 दिवसांच्या विश्रांतीनंतर सकाळी साडे सहा वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच माऊलींचे दर्शन घेवून वारकर्यांनी पंढरीची वाट धरली. ज्ञानेश्ऐवर मंदिर येथे नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक, श्रीराम साखर कारखाना, श्रीराम बझार, श्रीराम एज्युकेशन संस्था इत्यादिंच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग झाल्याने या महामार्गावरील सर्व झाडी तोडून काढली आहे. आळंदी ते फलटण या वाटचालीत एक झाडही नसल्याने वारकर्यांना कोठेच सावली मिळाली नाही. मात्र फलटण ते बरड या वाटचालीत गोविंद दूध डेअरी ते नीरा उजवा कालवा या वाटचालीत अहिल्यादेवी होळकर यांनी लावलेली वडाची दाट झाडे वारकर्यांना गार सावली देत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात निघालेला हा सोहळा सकाळी 8 वाजता श्रीराम सहकारी साखर कारखाना पार करून गोविंद डेअरीजवळ वटवृक्षाच्या गर्द छायेत सकाळच्या न्याहरीसाठी विडणीकडे मार्गस्थ झाला. फलटणचा ओढा ओलांडून सोहळा पुढे आला. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेली वटवृक्षाची ही गर्द झाडी वारकर्यांना सावली देत होती. वडाच्या पारंब्या माऊलींच्या रथाला स्पर्श करण्यासाठी आसुसलेल्या दिसत होत्या. फलटण ते विडणी हा प्रवास अत्यंत सुखकर वाटत होता. वारकर्यांना गर्द झाडीतील ही वाटचाल सुखकर वाटत होती. पालखी मार्गावर अशी गर्द झाडी केवळ फलटण ते नीरा उजवा कालवा या टप्प्यातच असल्याने या गर्द झाडीतून प्रवास करताना भजनालाही रंग चढत होता. वारकरी आनंदाने नाचत गात वाटचाल करत होते.
सकाळी सव्वा नऊ वाजता सोहळा विडणी हद्दीत पोहोचला. येथे ग्रामस्थांनी माऊलींसह सोहळ्याचे उत्साही स्वागत केले. त्यानंतर 9.45 वाजता हा सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. शेतामध्ये वारकर्यांनी सकाळची न्याहरी उरकली. सकाळची न्याहरी उरकून दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी हा सोहळा पिंपरदकडे मार्गस्थ झाला.
आज सकाळपासूनच कधी ढगाळ, तर कधी ऊन असे वातावरण होते. टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाच्या जयघोषात वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने मार्गक्रमण करत होते. सकाळी 11. 30 वाजता पिंपरद येथे पोहोचल्यानंतर सोहळ्याने दुपारचे भोजन व विश्रांती घेतली. दुपारचे भोजनानंतर हा सोहळा दुपारी 1.30 वाजता निंबळक फाटाकडे मार्गस्थ झाला. पिंपरद ते निंबळक फाटा या वाटचालीत आकाशात ढग जमा होवू लागले. यामुळे कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण हा लपंडाव सुरू होता. मध्येच पावसाची भुरभुर सुरू होती. मध्येच येणारी एखादी वार्याची झुळुक वारकर्यांना सुखावून जात होती. निंबळक फाटा येथील विसाव्यानंतर सोहळा सायंकाळी पाच वाजता बरड येथील पालखी तळावर पोहोचला. समाजआरतीनंतर हा सोहळा बरड येथे विसावला.
माऊलींचा उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह उद्या सोमवार दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवली आहे.