मुंबई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांना वेध लागलेत ते आषाढी वारीचे. पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपुरला जातात. वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे. कारण राज्यभरातून वारीसाठी दोन हजार नवीन बस धावणार आहेत. इतकंच नव्हे तर, वारकऱ्यांसाठी नवी कोरी लालपरी धावणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालपरी दाखल होणार आहे. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाण्याऱ्या भाविकांना प्रवास आता विनाअडथळ्यांचा होणार आहे.
दरवर्षी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. त्यामुळे आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवास अनुभवता येत होता. मात्र, 2016 नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून जुन्या बसनेच आषाढी वारी, दिवाळी यांचा प्रवास सुरू होता. गतवर्षी पुणे विभागातून आषाढी वारीला पुण्यातून पंढरपूरसाठी 380 बस सोडण्यात आल्या. मात्र, या सर्व बस जुन्या होत्या, त्यामुळे भाविकांचा प्रवास थोडा कसरतीचाच होता.
मात्र, यंदा राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागात 65 लालपरी नव्याने दाखल झाल्या असून, पुढील महिन्याभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत.
वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी
आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते. तसंच, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल. पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.