फलटण : तालुक्यातील बरड गावचे सुपुत्र तथा ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे हे सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले त्यांच्या वीरमरणामुळे बरड गावासह संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव उद्या सोमवारी गावी पोहोचणार असून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
नायक विकास गावडे हे भारतीय लष्कराच्या ११५ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मोहिमेअंतर्गत ते शांतता राखण्याच्या जबाबदारीवर कार्यरत असताना कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या या शूर जवानाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद जवान नायक विकास गावडे यांचे पार्थिव आज सकाळपर्यंत त्यांच्या मूळगावी बरड (ता. फलटण) येथे पोहोचणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या संदर्भात माहिती देताना फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी शहीद जवानाच्या पार्थिव आगमनाची व अंत्यसंस्काराची प्रक्रिया प्रशासनाकडून समन्वयाने पार पाडली जाणार असल्याचे सांगितले. प्रशासनातर्फे आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात येत असून देशासाठी बलिदान दिलेल्या नायक विकास विठ्ठलराव गावडे यांच्या वीरमरणामुळे गावात शोकमग्न वातावरण असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहील, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.