‘दाभोळकर हत्या आणि मी’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

by Team Satara Today | published on : 19 April 2025


सातारा :  “डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात १० वर्षे तुरुंगात खितपत पडलेले आरोपी शेवटी निर्दोष ठरतात. त्यांच्या आयुष्याची कोण जबाबदारी घेणार?  कोणी यावर प्रश्न का विचारत नाही? भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्यांचे खटले चालतात, पण न्यायाधीश किंवा न्यायालयीन संस्थांवर कारवाई करणारी स्वतंत्र यंत्रणा आजही अस्तित्वात नाही. 'हिंदू आतंकवाद' म्हणून प्रचार केला जातो, पण मुस्लिम आतंकवाद्यांना तसे संबोधण्याची हिंमत कोणी दाखवत नाही.” डॉ. दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ फक्त हिंदू धर्माच्या विरोधातच केंद्रित होती, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.  ते ‘ दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तका च्या  प्रकाशन समारंभात बोलत होते.

अन्याय, अटक आणि मानसिक छळ या सगळ्यांना सामोरे जाऊन सत्याशी प्रामाणिक राहिलेल्या एका निरपराध हिंदू युवकाच्या लढ्याची सत्यकथा मांडणार्‍या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सातारा येथील सिद्धिविनायक  मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या वेळी व्यासपीठावर पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती  समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.  या सोहळ्याला ३०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

“माझा मानसिक छळ झाला, पण मी डगमगलो नाही!” – श्री. विक्रम भावे

लेखक विक्रम भावे म्हणाले, “डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’ने माझ्यावर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर खोटे आरोप लावून मानसिक छळ केला. ज्या खोट्या पुराव्यांच्या आधारावर आरोपपत्र तयार करण्यात आले, ते पाहता हा खटला केवळ मृत व्यक्तीचे ‘मोठे नाव’ असल्यामुळेच उभा राहिला. पोलिसांना कोणालाही पकडून शिक्षा द्यावीच लागते, हीच यंत्रणांची मानसिकता झाली आहे.”

“हिंदूंसाठी लढल्यास तुरुंग, जिहादींसाठी लढल्यास पुरस्कार?” – अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, “मी हिंदूंच्या बाजूने खटला लढवला म्हणून मला अटक झाली. पण जे वकील नक्षलवादी किंवा जिहादींसाठी खटले लढतात, त्यांना काहीही होत नाही. विक्रम भावे यांनी जर नक्षलवाद्यांसाठी पुस्तक लिहिले असते,  तर त्यांना आज नोबेल पुरस्कार मिळाला असता. माझ्या कुटुंबाचे आणि व्यवसायाचे नुकसान होईल, पण मी घाबरणार नाही. या पुस्तकात व्यथा आहे, पण त्याहून अधिक निर्धार आहे.”

“हिंदूंनो संघटित व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, “श्री. विक्रम भावे यांनी जरी अनेक त्रास सोसले असले, तरी हिंदुत्वाच्या कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. जर हिंदू संघटित होऊन लढले, तर आम्ही नक्की तुमच्यासोबत आहोत. डॉ.  दाभोलकर जिवंत असते, तर अंनिसमधील आर्थिक घोटाळ्यांमुळे ते आज कारागृहात असते', असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

“हे पुस्तक म्हणजे वास्तवाचे प्रातिनिधिक आत्मचरित्र” – श्री. सुनील घनवट

श्री. सुनील घनवट म्हणाले, “हे पुस्तक कोणतीही काल्पनिक कथा नाही, तर २००८ ते २०२२ या काळात एका निर्दोष हिंदू तरुणाला भोगावा लागलेला प्रचंड अन्याय आहे. विक्रम भावे हे एकट्याचे उदाहरण नसून हजारो हिंदूंना केवळ ‘हिंदू  आतंकवाद’ या बनावट बागुलबुव्याच्या नावावर फसवले गेले. हजारो साधकांवर चौकशी, महिलांना रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात बोलावणे, मानवाधिकारांचे सर्रास उल्लंघन – हे सर्व या व्यवस्थेचे कुरूप वास्तव आहे.”

या वेळी सोहळ्यानंतर अनेकांनी पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांच्याशी आवर्जून संवाद साधत त्यांची विचारपूस केली, त्यांच्यावरील भयानक अत्याचार जाणून घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पेट्रोल पंपासमोरून ट्रकची चोरी
पुढील बातमी
बेरजेचे राजकारण करुन जिल्हा राष्ट्रवादीमय करणार

संबंधित बातम्या