सातारा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने अचारसंहिता लागू केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. झेडपीच्या अनेक अधिकारी व कर्मचार्यांना इलेक्शन ड्युटी लागली आहे. यामुळे अनेक विकासकामांना ब्रेक मिळाला आहे. अधिकारी व कर्मचारीच जाग्यावर नसल्याने नागरिकांच्याही कामांचा खोळंबा होणार आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वी बिले काढणे, कामांना मंजुरी देणे, योजनांची कामे करणे यामध्ये व्यस्त होते. मात्र, अचारसंहिता लागू झाल्याने केवळ निवडणूक हा एकच विषय आता हाती घेण्यात आला आहे. अचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व शासकीय कामे ठप्प झाली आहे. विकासकामांना ब्रेक देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेसह ग्रामपंचायतीही आदर्श अचारसंहितेचे पालन करावे, याबाबत नोटीसा काढण्यात आल्या आहेत. विकासकामांच्या फलकांना झाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या निवडणूक कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी निवडणूकीच्या कामावर हजर झाले आहेत. काही कर्मचारी व अधिकारी निवडणुकीच्या कामकाजासह आपल्या नेहमीच्या कार्यालयातील कामकाजही करताना दिसत आहेत. तसेच आचारसंहिता जारी झाल्यापासून गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेत नागरिकांची ये-जा थंडावली आहे. तसेच कामानिमित्त एखादा नागरिक जिल्हा परिषदेच्या विविध विभागात आल्यास त्याला आचारसंहिता आहे किंवा साहेब निवडणूक ड्यूटीवर आहेत अशी उत्तरे कर्मचार्यांमधून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामांचाही आता खोळंबा होत आहे.
गत दोन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांची वाहने ताब्यात घेण्याचा विषय राहिलेला नाही. ही सर्व वाहने प्रशासनाकडेच जमा आहेत. आता या वाहनांचा वापर विधानसभा निवडणुकीसाठी केला जाणार आहे.