नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

by Team Satara Today | published on : 16 June 2025


सातारा : नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, नगर रचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी हनुमंत हेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 1153  चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात  नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

यामध्ये महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा या चार तालुक्यातील 265 गावांचा समावेश आहे.  या क्षेत्रात पर्यटन वाढीच्या अनुषंगाने अनेक योजना प्रस्तावित आहेत.

पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विकास केंद्र संकल्पना राबविण्यात येणार असून पर्यटकांच्या सुविधांसाठी हे हब राहील याद्वारे सभोवतालच्या स्पॉक्स मधील पर्यटन नंदनवनाशी जोडले जातील. 

या अंतर्गत बामणोली जलपर्यटन विकास केंद्र विकसित करण्यात येणार असून यामध्ये कॅम्पेनिंग साईट, साहसी उपक्रम,  नौकाविहार, रोपवे अशा ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. 

यामध्ये होम स्टे, ऍग्रो टुरिझम या योजना  20 गावांमध्ये राबविण्यात येणार आहेत.  १४ उद्योग समृद्धी केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे. कृषी उत्पादन प्रक्रिया, तयार उत्पादने, बांबू आधारित उत्पादने, औषध आधारित उत्पादने यांचा समावेश राहील.

44 ग्राम समूह विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये दळणवळण, आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. महाबळेश्वर विभागामध्ये 30 जावळीत 33 सातारा 27 आणि पाटणमध्ये 57 असे पर्यटक नंदनवन  एकूण 147 प्रस्तावित आहेत. यामध्ये नियोजनबद्धरीतीने वृक्षारोपण करण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्या अखंड प्रवासापासून आरामदायी निवास आणि जेवणाचे पर्याय आणि प्रसन्न अनुभव या पर्यटक नंदनवन मधून पर्यटकांना मिळेल. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होईल असा विश्वास आहे.

या प्रकल्पाच्या विकासासाठी अल्पकालीन, मध्यम कालीन व दीर्घकालीन अशा योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. पाच एकरावर न्युरोपॅथी सेंटर, शंभर एकरामध्ये आयुष मंत्रालयामार्फत बोटॅनिकल गार्डन प्रस्तावित आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारी

संबंधित बातम्या