समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे

बिकानेरमध्ये २ फेब्रुवारी रोजी अनावरण

नवी दिल्ली : बिकानेरचे प्रसिद्ध समाजसेवक हरखचंद नाहटा यांच्या स्मरणार्थ २५ रुपयांचे स्मृती नाणे जारी करण्यात येणार आहे. नाहटा यांचे सामाजिक योगदान आणि औदार्य पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

१९३६ मध्ये बिकानेरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात हरखचंद नाहटा यांचा जन्म झाला. समाजकार्य आणि उद्योजक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशभरातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजकल्याण, धर्म, कला, संस्कृती आणि प्राण्यांबद्दल दयाळूपणा याचा प्रसार त्यांनी केला.

त्यांनी आदिवासी जीवनातील गंभीर आव्हाने सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी काम केले. पूर्वोत्तर राज्य त्रिपुराच्या धर्मनगर शहरापासून ते आगरतळापर्यंत रस्ता करण्यासारखे मोठे कार्य केले.

एकही पैसा न घेता...

-"टेक्निशियन स्टुडिओ कोलकाता" आर्थिक परिस्थितीमुळे बंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांचे कला आणि संस्कृतीबद्दलचे समर्पण जगाने पाहिले.

-नाहटा यांच्या व्यवस्थापनामुळे या स्टुडिओमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निर्मिती झाली.

-विशेष म्हणजे एकही पैसा न घेता त्यांनी तंत्रज्ञ आणि कलाकारांना यात भागीदार बनविले. नाहटा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त टपाल विभागाने १९९९ मध्ये एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले होते.

नवीन नाणे जारी करण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे तज्ज्ञ बिकानेरचे सुधीर लुणावत यांच्या मते, भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीतून बनवलेल्या या २५ रुपयांच्या नाण्याचे एकूण वजन ४० ग्रॅम असेल जे शुद्ध चांदीचे असेल.

नाण्याची एकूण गोलाई ४४ मिलीमीटर असेल. नाण्याच्या समोरील बाजूस हरखचंद नाहटा यांच्या चित्राच्या वरच्या बाजूस हिंदीमध्ये तर खालच्या बाजूस इंग्रजीत ‘श्री. हरखचंद नाहटा यांचा २५ वा स्मरणोत्सव’ लिहिलेले असेल.

चित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जीवनकाळ दाखविण्यात आला असून क्रमश: १९३६-१९९९ लिहिलेले असेल. 

मागील बातमी
नगरवाचनालयात चरित्रविषयक ग्रंथप्रदर्शन सुरू !
पुढील बातमी
प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी रद्द

संबंधित बातम्या