सातारा : महिलांवरील गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहर परिसरात घडलेल्या विनयभंगाच्या दोन घटनांमध्ये संशयितांना अटक करून शहर पोलिसांनी २४ तासांमध्ये संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले आहेत.
महिलांबाबत घडलेल्या विशेषतः विनयभंग व छेडछाडीच्या गुन्ह्यांचा तपास तातडीने करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी विनयभंगाच्या दोन गुन्ह्यांमध्ये संशयितांना अटक करून २४ तपासात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. येथील केबीपी कॉलेजसमोर तसेच देगाव फाट्यावर अमरलक्ष्मी परिसरात मुलीचा व एका महिलेचा विनयभंग करण्यात आला होता.
१२ व २३ जूनला या घटना घडल्या होत्या. हवालदार श्रीनिवास देशमुख व राहुल घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने संशयितांना अटक करून २४ तासांत दोषारोपपत्र सादर केले. अधीक्षकांसह अतिरिक्त अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या टीमने ही कारवाई केली. महिलांना त्रास देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.