अहमदाबाद : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग कंपनीच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक दाखले देत ह्या विमानाच्या सुरक्षिततेवर आणि त्याच्या उड्डाणावर, तांत्रिक बाबींवर चर्चा होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त करताना काही संदर्भ देत बोईंग विमानाच्या तांत्रिक बाबी तपासण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. तर, बोईंग कंपनीविरुद्ध गेल्या काही वर्षांत अनेक तक्रारी आल्या आहेत. डीजीसीएने (DGCA) एअर इंडियाला सुरक्षा उपाययोजनांबाबत अनेक पत्रे लिहिली होती. अमेरिकन सरकार आणि संसदेनेही या प्रकरणाची चौकशी केली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माजी सहसचिव सनत कौल यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे, आता सरकारने बोईंग कंपनीच्या विमानासंदर्भाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून (Air India) तपासणीसंदर्भातला रिपोर्ट डीजीसीएला सुपूर्द करावा लागणार आहे.
डीजीसीएने एअर इंडियाला लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाच्या देखभाल आणि तपासणी प्रक्रियेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात आता एटीएसचीही एंट्री झाली आहे. तर, बोईंग विमानाच्या संदर्भातने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हणजेच डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने बोईंग 787-8/9 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCA ने एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डीजीसीएचे महत्त्वाचे निर्देश:
1. 15 जून 2025 पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक:
2. इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी
3. केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
4. इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
5. इंधन चालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
6. हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
7. टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा
8. ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ ही प्रणाली तात्पुरत्या कालावधीत दरम्यानच्या तपासणीत समाविष्ट केली जाणार आहे.
9. पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक.
10. मागील 15 दिवसांत झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या पुनरावलोकनानंतरच देखभाल प्रक्रिया पूर्ण समजली जाईल.
राज ठाकरेंनी बोईंग विमानाबद्दल नेमकं काय म्हटलं?
विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी 2013 ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे 2013 ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं. जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान 28 जानेवारी 2014 ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं, असे राज ठाकरेंनी म्हटलं.