सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. आता भरतीत पात्र उमेदवारांच्या यादीनुसारच पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्या उमेदवारांना लवकरच सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याची सूचना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेने मार्च २०२६ मध्ये नोकरभरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, पात्रता यादीतील काही उमेदवारांवर अन्याय झाल्याची तक्रार विभागीय सहनिबंधकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार व पणन विभागाने ३० मार्च २०२६ रोजी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती.
दरम्यान, ही स्थगिती उठविण्यात आल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थगिती उठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थगिती उठल्यानंतर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची कागदपत्रे बॅंकेकडे जमा करण्याची सूचना ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे.