छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्‍यांना ठेचून काढलं पाहिजे : खा. उदयनराजे

अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे भोसले संतापले

by Team Satara Today | published on : 05 February 2025


सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात असून त्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी होत असतानाच दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत, महापुरुषांबद्दल अशी विधानं करणार्‍यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजेतसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार मांडल्याचे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. त्यांनी कधी स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपलं कुटुंब मानलं. त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही. असं असताना अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छं विधानं करतात. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, हा सोलापूरकर कोण आहे? अशा लोकांना लाच पलीकडे काही समजत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, असा हा प्रकार आहे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणार्‍यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात जी तेढ निर्माण होते ती अशा विकृत लोकांमुळे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणार्‍यांना फिल्म इंडस्ट्रीजमधील लोकांनी थारा दिला नाही पाहिजे. मला वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. जे अशी विधानं करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.

दरम्यान अभिनेता सोलापूरकरच्या विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी सोलापूरकर यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले, निषेध मोर्चे काढण्यात आले. यावेळी महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील वातावरण अधिक तापले असून, सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमेरिकेतून बाहेर काढलेले लोक C-17 ने भारतात परतणार !
पुढील बातमी
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता

संबंधित बातम्या