पहिल्या भागात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कोणत्याही निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण एक पत्रकार म्हणून निःपक्षपणे करताना अनेकांवर मर्यादा येतात, हे मी याआधीही स्पष्ट केले आहे. पहिल्या भागावर अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या. विशेषतः गुलाल तिकडे चांगभले या गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या माध्यमांच्या विपरित लिखाण असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दुसऱ्या भागास थोडा उशीर झाला. असो.
तसे पाहायला गेल्यास या निवडणुकीतून कुणाच्याच हाताला फारसे काही लागल्याचे दिसून येत नाही. एका अतृप्ताचा अपवाद वगळता. कारण विजयी झालेल्या डॉ. सुरेश भोसले यांना आता हा डोलारा घेऊन पुढे वाटचाल कशी करायची, असा प्रश्न पडला असेल. ते जात्याच हुशार आहेत. मार्ग काढतीलही. ही निवडणूक कराड तालुक्यातली आणि बॉण्ड्री वरच्या वाळवा तालुक्याशीही संबंधित होती. हा भाग तसा किती संवेदनशील आहे, याची ख्याती महाराष्ट्रभर आहे. तरीही एकही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली. यासाठी प्रशासनाला नव्हे तर कोरोनाला धन्यवाद द्यावे लागतील.
डॉ. इंद्रजित मोहिते हे तिसर्या क्रमांकावर गेले तर अविनाश मोहिते दुसऱ्या. सभासदांनी भोसले यांच्या पदरात मतांचे दान इतके भरभरून टाकले की आता भोसलेंना ट्रस्टचे आणि जयवंत शुगरचे एक्सपान्शन लांबणीवर टाकून कृष्णाचे आधी करावे लागेल. आम्हाला दरही जयवंत शुगर, सह्याद्रीपेक्षा जास्त हवा, दुसरा वजन काटाही उभारू द्यावा, तो त्यांच्या ट्रस्टचा किंवा खाजगी नसावा म्हणजे आमच्याही मनात संशयाला जागा राहणार नाही, कृष्णाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या साम्राज्यात आमचाही हक्क मान्य करावा, अक्रियाशील सभासदांना क्रियाशील करावे, मयत सभासदांच्या वारसांच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करावेत, ऊस नोंदी कराव्यात, ऊस वेळेत न्यावा, सूडबुद्धीने वागू नये, कारखाना कर्जातून नील करावा, उपटसुंभ कार्यकर्त्यांची खोगीर भरती रद्द करून कामगारांची देणी द्यावी, गेटकेनचा ऊस आणून मलिदा मारू नये, पुंड संचालकांना व त्यांच्या बगलबच्च्यांना कंत्राटे देऊ नयेत, कृष्णाच्या कार्यक्षेत्रातील ऊस जयवंतकडे वळवू नये, घाटावरच्या सभासदांना दुय्यम वागणूक देऊ नये, कारखान्याचा वापर डॉ. अतुल भोसले यांना आमदार करण्यासाठी करू नये, अशा भरमसाठ अपेक्षा सभासदांनी व्यक्त करून भरमसाठ मते देऊन विजयी केले असले तरी भोसले यांना त्या पूर्ण करणे कितपत शक्य होईल, हे येणारा काळ ठरवेल. जर काही चुकले तर डॉ. अतुल भोसलेंना विधानसभेवर जाण्यात खोडा निर्माण होईल.
भोसले यांच्या निम्म्यानेही मते अविनाश मोहितेंना मिळाली नाहीत. गेल्या वेळी त्यांचे सहा संचालक कसेबसे निवडून आले. भोसलेंनी त्यांच्या पाच वर्षातील कामाच्या फायली काढल्याने पाच वर्षातील तीन महिने वगळता त्यांचा सर्व काळ कोर्टकचेऱ्या यातच गेला. या तीन महिन्याच्या एकांतात काहीही करणे शक्य नव्हते. त्यामुळे सभासद शेतकरी, पॅनेल संघटना याकडे अविनाश मोहिते यांचे दुर्लक्ष झाले. डॉ. सुरेश भोसले चेअरमन म्हणून कारभार करीत असताना डायरेक्टर बोर्डाच्या मीटिंगमध्ये निर्णय घेऊन सह्या ठोकता ठोकता अविनाश मोहितेंवर केसेसही ठोकत होते. आताच्या निवडणुकीचे जे मुद्दे अविनाश मोहिते यांनी मांडले, ते त्यांनी पाच वर्षे हिरीरीने मांडायला हवे होते. पण वर म्हटल्याप्रमाणे वेळेचे बंधन आणि भोसले कधी कोणती फाइल गोपाळनगरच्या ऊस उपसणाऱ्या पोरग्याप्रमाणे उपसतील याचीच जास्त काळजी! दुसऱ्या काट्यावर उसाचे वजन करून नंतर कारखान्याच्या काट्यावर कमी भरल्यास एक लाख बक्षीस! ही त्यांची घोषणा पुढील काळात राज्यभर महत्त्वाची ठरेल. पाच-सहा वर्षापासून त्यांनी असे मुद्दे ताणून धरायला हवे होते. ते धरले नाहीत.
डॉ. इंद्रजित मोहिते यांना मिळालेली मते ही अविनाश मोहिते यांच्या निम्म्यावर आली. ते गेली अकरा वर्षे अविनाश मोहिते व डॉ. सुरेश भोसले यांच्या कारभाराविरुद्ध लढताना आपल्या अभ्यासूपणाचा परिचय देत होते. पण निवडणुकीत लागणारे कौशल्य, संघटनात्मक बांधणी त्यांना करता आली नाही. या कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार त्यांनी तसा सहा वर्षांपूर्वीच सुरू केला होता, पण दवाखाना बघू का गावे फिरू, असा संभ्रम झाला असावा. सोशल मीडियावरून ते आपले मुद्दे योग्य शब्दात परखडपणे मांडत होते. पण ते कुठे कुठे पोहोचणार? निवडणुकीच्या आधीपासूनच रयत संघर्ष मंचचे पुनर्संघटन करून ते गावोगाव पोहोचले. मात्र त्यांचे मुद्दे पोहोचले नाहीत. कारखाना असो वा आमदारकी, तिथं विजय संपादन करायचा म्हणजे गडी एकदम मोकळा ढाकळाच पाहिजे. आणि विरोधातून सत्ता खेचायची म्हणजे सध्याच्या जमान्यात महाकठीण! असे काम फक्त दिल्लीतच होऊ शकते. बाकी त्यांनी फेसबुक व्हाट्सअपच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने अगदी योग्य होते. डॉ. सुरेश भोसले आता या आयत्या मिळालेल्या मुद्द्यांचा उपयोग कृष्णा साठी करतील की जयवंत शुगरसाठी हे त्यांनाच माहीत. कोरोनाकाळात डॉ. मोहितेंनी कृष्णा ने सॕनिटायजर निर्मिती करावी, हा मुद्दा मांडला. भोसलेंनी लोकप्रियतेसाठी का होईना, लगेच अंमलबजावणी केली. इतर अडचणीचे मुद्दे टाळले, हा भाग वेगळा.
डॉ. भोसले यांच्या विजयाला अनेक कारणे आहेत. त्यातील काही वर दिलीत. त्यावर जास्त चर्चा नको. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पराभवाची कारणे आलीत. आता या विषयातील ठळक कारणाकडे येऊ. भोसले ग्रुप हा राजकारणात संधी साधू, पक्ष बदलू असा कितीही ठपका ठेवला तरी गेली सहा वर्षे ते भाजप या पक्षाशी इमानदार, एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिले हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. भाजपा शेतकरी विरोधी पक्ष आहे हे दिल्लीतील सात-आठ महिन्यांपासून चाललेल्या आंदोलनावरून दिसून येते. भोसलेंनी येथे निवडणुकीत पक्ष बिक्ष आणला नाही. या काळात त्यांच्यासह त्यांना मते देणारेही विसरून गेले की ते भाजपचे समर्थक आहेत. मात्र विरोधक विसरले नव्हते. अविनाश मोहिते यांचा उदय झाल्यामुळे राष्ट्रवादीला कराड दक्षिणच्या वाळवंटात थोडी हिरवळ दिसली. त्यांच्याकडे विधानसभेला पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नव्हता. डॉ. इंद्रजित मोहिते तसे काँग्रेसचे. त्यामुळे मग निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांना जुळवाजुळवी, मिळवामिळवी करावी लागली. ते काही सक्सेस झाले नाही. त्याची कारणे विश्लेषणाच्या पहिल्या भागात आली आहेत. झाले ! पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेतून अंग काढून घेतले आणि ही मोळी बांधायच्या आधीच तुटली. तशी अविनाश मोहिते आणि डॉ. मोहितेंनी स्वतंत्र लढायची तयारी केलीच होती. नकळत त्यांनी काही उमेदवारांच्या नावांची वाच्यता केली आणि मग लाखोंमध्ये त्यांची खरेदी करण्यात आली. ती खरेदी कोणी केली ते कुण्ण्ण्णालाच माहीत नाही! अनेकांनी स्वतःच अमुक तमुक पॅनेलने उमेदवारी दिल्याचे पिल्लू सोडले आणि वाहत्या कृष्णेत हात धुतले! अर्ज मागे घेईपर्यंत चाललेला खेळ संपला. मग डॉक्टर अतुल भोसले यांचे समान शत्रू असलेल्यांमध्ये फूट पडली. पहिल्या भागात पश्चातबुद्धी म्हणून उल्लेख केलेले उदयसिंह पाटील उंडाळकर अविनाश मोहितेंबरोबर गेले. पृथ्वीराज चव्हाण यांची टीम इंद्रजित मोहितेंबरोबर गेली. पण पूर्णपणे नाही. उंडाळकर हे चव्हाण टीम बरोबर न राहता त्यांच्याविरुद्ध टीमकडे का गेले, त्यांचे मनसुबे काय आहेत, हे त्यांनाच माहीत. मात्र राजकारणात ते अजूनही अपरिपक्व असल्याचे या निर्णयावरून दिसले. बहुदा विलासराव उंडाळकर यांनी त्यांची राजकीय एंट्री उशिरा केल्यामुळे हे घडत असावे. खरेदी विक्री संघ, बाजार समिती, जिल्हा बँक वगैरे कारणे दिली जातात. ते अप्रत्यक्षपणेही स्वतः न्यूट्रल राहून आणि कार्यकर्त्यांना पिटाळून करता आले असते. झाकली मूठ ही झाकलीच राहिली असती. बाळासाहेब पाटील, जयंत पाटील स्वतः का बरे यात उतरले नाहीत? त्यातून थोडा तरी बोध त्यांनी घ्यायला हवा होता. राजकीय प्रगल्भता दाखवायला हवी होती.
आता चेअरमनपद तुला की मला, अडीच अडीच वर्षे की पाच वर्षे, संचालक तुमचे ज्यादा की आमचे! मग काँग्रेसचे किती? या चर्चा सुरू असताना तिकडे लंगोट चढवून तयार असलेले जगदीश जगताप, धोंडीराम जाधव, दयानंद पाटील, आनंदराव मोहिते या कसलेल्या पैलवानांना गुदगुल्या होत होत्या. आपली सरदारकी पाच वर्षे वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. ढोर मेहनत म्हणा हवे तर!
दोन्ही मोहितेंच्या, सत्ता येण्याआधीच्या सत्ता वाटपाच्या बैठका कृष्णेच्या सभासद शेतकऱ्यांना पटल्या नसाव्यात. डॉ. इंद्रजित मोहिते एकदा अविनाशवर आरोप करतात. तरीही जुळवून घेऊ म्हणतात. अविनाश मोहिते स्वतःच्या डोक्याने काहीही न करता एका पत्रकाराच्या इशाऱ्यावर चालतात. या गोष्टी सभासदांना पटल्या नाहीत. दोघे एकत्र आले असते तर? हा प्रश्न आता उपस्थित करून मग काय झाले असते, याला अर्थ नाही.
एक वेगळी किनार - यशवंतराव मोहिते यांनी कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या नावाने कारखान्याचा नामविस्तारही झाला. यशवंतरावांचे दुर्दैव असे की भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ पत्रके, फ्लेक्स कशावरही त्यांचा एकही फोटो कुठेही दिसला नाही. इतक्या लवकर ते संस्थापकांना विसरले. सभासदांचे तसे होणार नाही, असे समजून चालू.
शिवाजी काळभोर,
पत्रकार, सातारा.
९७६४३१८०४०
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |