04:29pm | Apr 22, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात माढा लोकसभेच्या अनुषंगाने रणकंदन सुरु आहे. गेल्या 25 वर्षांपासून फलटणची सत्ता ‘वन वे’ आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत सत्तासंघर्ष सुरु असताना फलटण तालुक्यात एकहाती सत्ता राखून ठेवण्याचे मॅनेजमेंट विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह त्यांच्या दोघाही बंधूंनी ठेवले आहे. परंतू लोकशाहीला घराणेशाही मान्य नाही. त्याचा प्रत्यय फलटण तालुक्यातील सामान्य घटकाला येवू लागला आहे. त्यामुळेच फलटण तालुक्यातही आता बदलाचे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे. सुमारे 23 वर्षानंतर फलटण तालुक्याला भूमिपुत्र खासदार निवडून आणण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची केल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. माढा राखणार, तोच फलटणचा ‘गॉडफादर’ होणार, हे आता निश्चित झाले आहे.
70 च्या दशकात प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार, पत्रकार मारिओ पूझ्झो यांची ‘गॉडफादर’ नावाची कादंबरी अमेरिकेसह जगभरात प्रचंड गाजली होती. ही कादंबरी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. या कादंबरीवर आधारित ‘गॉडफादर’ नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्या काळात उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित केले. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मार्लोन ब्रॅडो याने इटालियन-सिसिलियन अंडरवर्ल्ड माफिया व्हिंटो कार्लियोनी याची भूमिका साकारली होती. 40-50 च्या दशकातील अमेरिकेतील न्युयॉर्कमधील अंडरवर्ल्डमध्ये दबदबा ठेवण्यासाठी दोन कुटूंबामध्ये कशाप्रकारे रक्तरंजित सामना झाला, याचे परिपूर्ण चित्रण या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. या चित्रपटामुळे अमेरिकेतील समाजमनावर दूरगामी परिणाम झाले. त्या काळातील न्युयॉर्कमध्ये सामाजिक, आर्थिकक्षेत्रेही या रक्तरंजित घटनांमुळे प्रभावित झाली होती. या ‘गॉडफादर’च्या धर्तीवर फलटणमधील राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रही वाटचाल करीत आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत.
1995 साली फलटणमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. गिरवीचे सुपूत्र असणार्या कॉंग्रेसच्या तगड्या आणि विधानसभेतील मुलूखमैदान तोफ म्हणून नावाजलेल्या सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांचा अपक्ष म्हणून नशिब आजमावणार्या मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पराभव केला होता. चिमणराव कदम यांच्या स्पष्टवक्तेपणाची त्यांना जबर किंमत या निवडणुकीत मोजावी लागली होती. अगदी थोडक्या मतांच्या फरकाने त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर ‘अच्छे दिन’ येतील असे वाटले होते. परंतू ‘अच्छे दिन’ हे फलटणकरांचे स्वप्नच राहिले. फलटणमधून नीरा उजवा कालवा वाहतो. परंतू या पाण्याचा फलटण तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागाला कधीच फायदा झाला नाही. या भागाला कायमस्वरुपी दुष्काळाचा कलंक लागला होता. या भागालाही पाणी मिळावे, यासाठी दिवंगत माजी आमदार चिमणराव कदम विधानसभेत आग्रही होते. शिवसेनेच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला व प्रसंगी पदयात्राही काढल्या. परंतू याचे श्रेय मात्र काहींनी घेतले व आपल्या नावासमोर ‘भगिरथ’ ही उपाधी चिटकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
पाण्याच्या बाबतीत फलटण तालुक्याचे राजकारण सुमारे 25 वर्षे तापवले गेले. लोकांपर्यंत सत्त्यच पोहोचू दिले नाही. धोम-बलकवडीचे पाणी आंदरुडपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणी, किती पैसे खाल्ले? याचा हिशोबही लोकांकडे आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती व विधानसभेच्या निवडणुका आल्या की आदर्कीच्या माळरानावर धोम-बलकवडीचे पाणी सोडायचे, त्या पाण्याची ओटी भरायची, नारळ फोडायचे आणि लोकांच्या भावनेला हात घालून मते मिळवायची, हा उद्योग गेल्या 15 वर्षात कोणी केला, हे फलटणकरांना चांगलेच माहित आहे. फलटणचे राजकारण हे गेल्या 25 वर्षात पाणीप्रश्नावर लढले गेले. गेल्या काही वर्षांमध्ये धोम-बलकवडीचे पाणी तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागातून वाहू लागले आहे. परंतू यासाठी मात्र फलटणकरांना तब्बल 20 वर्षे वाट पहावी लागली. परंतू राजकारणात आणि साठेमारीत मात्र फलटण तालुक्याचे अतोनात नुकसान झाले. याचा हिशोब कोण देणार? फलटणमध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. अशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी कमिन्स इंडिया ही कंपनी सुरवडीच्या माळावर उभी केली. स्थानिकांना व भूमिपुत्रांना या कंपनीमध्ये रोजगार दिला जाईल, अशी वल्गना ज्यांनी कंपनी आणली, त्यांनी केली होती. परंतू या कमिन्समध्ये किती स्थानिक व भूमिपुत्रांना रोजगार मिळाला, हा संशोधनाचा भाग होईल. ज्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी गेल्या, त्यांनाही या कंपनीने नोकर्यांमध्ये सामावून घेतले नाही. त्यामुळे तालुक्यात मोठी कंपनी येवूनसुद्धा त्याचा फायदा स्थानिकांना काडीमात्र झाला नाही. प्रत्येक कंपनीला सीएसआर फंडाच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाच्या दोन टक्के वाटा हा स्थानिक विकासासाठी खचृ करायचा असतो. परंतू हा फंड कोणाच्या घशात गेला, हेही फलटणकरांना चांगलेच माहित आहे. सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, भांडवली नफ्यावर आधारलेली समाजसेवा.
2013 साली सीएसआर हा कायदा अस्तित्वात आणला गेला. 135 आणि अनुसूची क्रमांक 7 मधील बदलानुसार ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी अथवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांनी तीन वर्षाच्या एकूण नफ्याच्या दोन टक्के रक्कम स्थानिक विकासासाठी खर्च करावयाची असते. परंतू ही दोन टक्के रक्कम कमिन्सने कोणाच्या घशात घातली? या कंपनीमध्ये कोणाची मुले उच्चपदस्थ आहेत? ठेकेदार कोणाचे आहेत? आणि ही कंपनी उभी करण्यासाठी जमिनी देवून कोणी योगदान दिले? हे फलटणकरांना आता तपासावे लागणार आहे. विकासावर बोला, असे म्हणणारे अनेक नग फलटणमध्ये आहेत. परंतू स्वत:चे ठेवायचे झाकुन आणि दुसर्याचे बघायचे वाकून, या सवयीमुळे फलटणचे राजकारण गलिच्छ पातळीवर घसरलेले आहे.
फलटण तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. परंतू सत्ताधार्यांनी नेहमीच फलटणमध्ये सर्वकाही ‘आलबेल’ आहे, असे भासवले आहे. फलटणमध्ये श्रीमंत फक्त सत्ताधारीच झाले, कार्यकर्त्यांनी फक्त सजरंज्याच उचलेल्या आहेत. विरोधकांचे उपद्रवमुल्य कमी असल्यामुळे त्यांना चिरडणे हा यांच्या डाव्या हाताचा खेळ झाला. कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था सध्या फलटणकरांची झाली आहे. माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकरांनी फलटणमध्ये खर्या अर्थाने लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आलेल्या डॉ. कृष्णचंद्र भोईटे, चिमणराव कदम यांनी फलटण तालुक्याच्या व्यथा शासन दरबारी मांडल्या. फलटण तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी आवाज उठवला. परंतू चिमणराव कदमांनी दळलेल्या पिठावर त्यांच्यानंतर आलेल्या ‘भगिरथांनी’ रेघोट्या ओढण्याचे काम केले आहे. पूर्वी फलटणमध्ये जातीय भाईचारा होता. गुंडगिरी औषधालाही शिल्लक नव्हती. लोक गरीब होते, परंतू स्वाभिमानी होते. परंतू 25 वर्षाच्या कार्यकालात चित्र नेमके उलटे झाले. विकासाच्या बाता मारुन अनेकांनी आपली घरे भरण्याचे काम केले आहे. राजकारणातून पैसा, पैशाच्या माध्यमातून गुंडगिरी व त्या गुंडगिरीच्या माध्यमातून राजकारण. हे चक्र फलटणमध्ये अव्याहतपणे सुरु आहे.
फलटणमध्ये 25 वर्षांपासून अवैध खासगी सावकारांनी उच्छाद मांडला होता. या अवैध खासगी सावकारांची वार्षिक उलाढाल 100 कोटींपेक्षा जास्त होती. या खासगी सावकारांना पाठिशी घालण्याचे काम कोणी केले, हे फलटणमधील शेंबडे पोरगेही सांगू शकेल. परंतू फलटणमधील अवैध खासगी सावकारी नेस्तनाबूत करण्याचा विडा ‘सातारा टुडे’ने उचलला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी न भूतो, न भविष्यती अशी कारवाई करीत फलटणमधील अवैध खासगी सावकारांचे कंबरडे मोडले. आज फलटणमध्ये अवैध खासगी सावकार नावालाही शिल्लक नसावा. अनेक खासगी सावकार आज आपल्या मूळ व्यवसायाकडून भंगार, लोखंड, पत्रा गोळा करु लागले आहेत. सुमारे 25 वर्षांपासून फलटणकरांना छळणारे हे अवैध सावकारीचे भूत ‘सातारा टुडे’च्या लेखणीमुळे सामान्य फलटणकरांच्या मानगुटीवरुन उतरले आहे. फलटण तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, सामान्य माणसाच्या स्थावर जंगम मालमत्ता, माता-भगिनींच्या इज्जतीला हात घालणार्या प्रवृत्तींना ‘सातारा टुडे’ने सोलून काढले. या सावकारांना पाठिशी घालण्याचे व त्यांच्याकडून कमिशनरुपी खंडणी घेवून फलटणमध्ये राजकारण करणारे कोण आहेत, हे फलटणकरांना चांगलेच माहित आहेत. परंतू आता हिशोब करण्याची वेळ आली आहे. जी संधी माजी आमदार स्व. हरिभाऊ निंबाळकर यांना मिळाली होती, तीच संधी आता फलटणकरांना चालून आली आहे. दूध का दूध और पानी का पानी फलटणकर नक्कीच करतील, यात शंका नसावी.
विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर माढ्याची जबाबदारी राष्ट्रवादी सुप्रिमोंनी दिलेली आहे. माढ्याची चाकरी केली तर सभापतीपदाची भाकरी मिस्टर रामराजेंना पुन्हा चाखायला मिळणार आहे. माढा हा आपला पारंपारिक मतदारसंघ हातातून जावू नये, यासाठीही राष्ट्रवादीने कंबर कसलेली आहे. माण-खटावमध्ये गोरे बंधूंनी रणजितसिंहांसाठी इंच न् इंच जागा पिंजून काढली आहे. माळशिरसमध्ये मोहिते-पाटीलही जिवाचे रान करताहेत. पंढरपूरच्या काही गावांमधून परिचारिकांनी जोर लावला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटलांनी भिरकीट लावलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरील डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. फलटणमध्ये भविष्यातील राजकारण टिकविण्यासाठी निकराची झुंज सुरु आहे. माढ्यावरच फलटणचे भविष्य अवलंबून आहे. रणजितसिंहांना थोपविण्यासाठी मिस्टर रामराजे यांनीही कधी नव्हे असा फलटणमध्ये तळ ठोकलेला आहे. कोपरा आणि जाहीर सभांच्या माध्यमातून आमचे भवितव्य तुमच्याच हातात आहे, अशी साद त्यांनी फलटणकरांना दिलेली आहे. त्यामुळे फलटणकर कोणाला स्विकारतात आणि कोणाला लाथाडतात, हे 23 मे ला समजणार आहे. मात्र माढ्याची ही निवडणूक फलटणमधील भविष्यातील ‘गॉडफादर’ ठरवणार, हे निश्चित.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |