11:28pm | Dec 24, 2019 |
सातारा : राज्यात नुकतेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले. शिवसेनेने केलेल्या दगाबाजीमुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरुनसुद्धा भाजपच्या पदरी निराशा आली. ऐनवेळी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांनी चक्रे फिरवून शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी ही कधी न शिजणारी खिचडी शिजवून सरकार स्थापन केले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार भाजपच्या जिव्हारी लागले असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणार्या सातार्यातूनच महाविकास आघाडीची रिक्षा उडविण्यासाठी भाजपने आपल्या भात्यातील खास उदयनास्त्र डागण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचा मुहूर्तही ठरला आहे.
2014 साली राज्यात आणि देशात ऐतिहासिक सत्तांतर झाले. गेली दीड दशके गळ्यातगळा घालून पिंगा घालणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रात धाराशायी झाले. कोणाच्या खिजगणतीत नसणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. साहजिकच विदर्भातील मुख्यमंत्री म्हटल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील विकासावर त्याचा परिणाम होणार, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी प्रादेशिक समतोल राखत राज्यात विकासकामे केली. परंतू एवढे करीत असतानाही पश्चिम महाराष्ट्रात भाजपची बाजू लंगडीच होती. भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आक्रमक चेहरा हवा होता. त्यातच मराठा क्रांती मोर्चा, कोरेगाव-भीमा दंगलीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. परंतू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मुत्सद्दीपणाने हे प्रश्न हाताळले. मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये भाजप सरकार यशस्वी ठरले. जी गोष्ट अनेक दशके कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जमली नाहीत, ते भाजपने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात करुन दाखवले. धोरणात्मक निर्णय घेण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात गेल्या पाच वर्षात भाजप सरकार यशस्वी ठरले. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत व्हिजनरी आकडे ठरविण्यात आले होते. त्यासाठी भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून इनकमिंग जोरात झाले. शेवटी भाजपला आक्रमक चेहरा हवा असल्याने त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार उदयनराजेंना गळाला लावून भाजपमध्ये म्हणजेच मूळ पक्षात घेतले. परंतू लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यामुळे उदयनराजेंना सातार्यातून बाहेर पडता आले नाही. तसेच सातारकरांवर दुसर्यांदा निवडणूक लादल्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजीही वाढली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी ‘त्या’ पावसातील सभेचा मोठा इव्हेंट केला होता. सातार्यात पाऊस सुरु झाला काय? असे खुद्द शरद पवार त्या दिवशी सभास्थळावर उपस्थित असणार्या आपल्या खास पंटरांना भ्रमणध्वनीवरुन विचारत होते. शेवटी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शरद पवारांची एन्ट्री झाली. सातार्यातील ‘ती’ धुवॉंधार पावसातील सभा राज्यभर गाजली. परिणामी राष्ट्रवादी-कॉंग्रेसबद्दल राज्यातील जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. परिणामी त्याचा उदयनराजेंच्या मताधिक्यावर परिणाम झाला. शरद पवारांनी सातारचे मैदान मारले. ‘मान छत्रपतींच्या गादीला, पण मत राष्ट्रवादीला’ अशी आरोळी तालीम संघाच्या मैदानावर ठोकण्यात आली. प्रत्यक्षात निकालाचा दिवस उजाडला. भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, कॉंग्रेस 44 आणि इतर 29 असा कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला. मात्र निकालाआधीच दिल्लीच्या 6 जनपथवर संजय राऊत व पवारांमध्ये खलबते झाली होती. गेल्या पाच वर्षात शिवसेनेला भाजपकडून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यास शिवसेनाही तयार होती. राज्यातील त्रिशंकू परिस्थिती पाहता शिवसेनाही अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्यूल्यावर अडून बसली होती. त्याला बारामतीची फूस होती. शेवटी काही झाले तरी नातीगोती कामाला येतात, ही शरद पवारांची नीती फळास आली. नाही-होय म्हणत अखेर महाआघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. अनपेक्षितपणे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंना विनाअट मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसविण्यात आले. यामध्ये नक्की अपरिहार्यता कोणाची? शिवसेनेची की भाजपची, याचे कोडे अद्याप सुटले नसले तरी भाजपही शांत बसणार नाही. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. मुंबई महापालिका राखण्यासाठी शिवसेना जोर लावणार आहे. मात्र त्या अगोदर भाजपा ईडीचा खेळ सुरु करणार आहे. त्यात पहिला बळी मिलिंद नार्वेकरांचा जाणार, त्यानंतर सगळ्यांचीच क्रमवारी ठरलेली आहे. सेक्युलर समजल्या जाणार्या कॉंग्रेस पक्षाने भाजपला धडा शिकवण्यासाठी राज्यात शिवसेनेसारख्या जातीयवादी-धर्मवादी पक्षाशी युती केल्यामुळे ते अनेक कट्टर कॉंग्रेसजनांना पटलेले नाही. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही या अभद्र युतीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे येत्या काळात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी ही महाआघाडी टिकवणे जिकिरीचे असणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीतून मोठ्या मताधिक्याने निवडून येऊनही काही महिन्यांतच सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजेंचा भाजपा-कॉंग्रेस-राष्ट्रवादी व पुन्हा भाजप असा प्रवास करुन ते पुन्हा स्वगृही परतले. परंतू राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्या सातार्यामध्ये प्रथमपासूनच उदयनराजेंना विरोध होता. मात्र 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत कराड हा लोकसभा मतदारसंघ विसर्जित करण्यात आला, तर नव्याने निर्मिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील फलटण व माण-खटाव विधानसभा मतदारसंघ जोडल्या गेल्यामुळे सातारा लोकसभेचे राजकीय गणित बिघडले होते. डॉ. बुधाजीराव मुळीकांच्या सुपिक डोक्यातून तयार झालेल्या भूमाता दिंडीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय पेचात उदयनराजे फ्रंट फूटवर आले होते. राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केल्यास उदयनराजेंच्या बंडखोरीमुळे आघाडीचा उमेदवार पडू शकतो, हे राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी ताडले होते. परंतू मै खडा तो... अशा तत्वाने चालणारे उदयनराजे राष्ट्रवादीला परवडणार नाहीत, असा सल्ला राष्ट्रवादीतील जुन्या जाणत्या पुढार्यांनी शरद पवारांना दिला होता. मात्र राजकीय गोळाबेरजेत माहीर असलेल्या शरद पवारांनी उदयनराजेंवर विश्वास ठेवला. उदयनराजेंनीही कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोठ्या मताधिक्याने 2009 चे लोकसभेचे मैदान त्यांनी मारले. 2014 लाही इच्छा नसताना व राष्ट्रवादीजनांचा विरोध असतानाही शरद पवारांनी उदयनराजेंवर विश्वास दाखवला. 2014 ची निवडणूकही उदयनराजेंनी मोठ्या मताधिक्याने जिंकली. परंतू राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरामुळे अनेकांची कोंडी झाली. सातार्याच्या विकासासंबंधीचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. यामध्ये सातार्यात वाहतुकीची कोंडी होणार्या पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर तयार करणे, पुढील पन्नास वर्षातील सातारकरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या कास तलावाची उंची वाढवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा शहराची हद्दवाढ, कृषी महाविद्यालय असे अनेक प्रश्न प्रलंबित होते. 2009 साली उदयनराजे प्रथम खासदार झाल्यानंतर त्यांनी हे प्रश्न खा. शरद पवार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे मांडले होते. मात्र, पाच वर्षाच्या कार्यकाळात शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंच्या अनेक मागण्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली. पृथ्वीराज चव्हाणांनी तर सातारा जिल्हा रुग्णालयात असणारे सिटी स्कॅन मशीन भिंत तोडून कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात पळवले होते. त्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयात येणार्या जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय व हेळसांड झाली होती. खाजगी रुग्णालयात अनेक रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. या आणि अशा अनेक भानगडी सातारच्या विकासाबाबत खुद्द पृथ्वराज चव्हाणांनी जिल्ह्यातील मुख्यमंत्री असतानाच केल्या होत्या. शरद पवारांचे राजकारण हे प्रथमपासूनच सातारा केंद्रित राहिलेले आहे. 1999 साली राष्ट्रीयतेच्या मुद्यावरुन पवारांनी राष्ट्रीय कॉंग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर सातारा जिल्हाच त्यांच्या पाठिशी उभा राहिला. परंतू शरद पवारांनी सातार्याचा विकास करण्यापेक्षा तो भकास करण्याकडे अधिक लक्ष दिले. सातारा जिल्ह्याच्या वाटणीचे पाणी बारामतीला पळवले. परंतू पवारांचे मांडलिक असणार्या इतर पुढार्यांनी याविरोधात ब्र शब्द उच्चारला नाही. हे धारिष्ट उदयनराजेंनी दाखवले. कदाचित त्याची किंमत उदयनराजेंंना चुकवावी लागली. परिणामी सातारा जिह्यिाचा विकास खुंटला. 2014 साली सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने उदयनराजेंना रेड कार्पेट टाकले. विकासकामांच्या मागणीसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराला फडणवीस सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत जिह्यिातील अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या. विशेषत: सातारा शहराशी संबंधित असणारे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सोडवले. 1999 साली कराड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राष्ट्रवादीतून प्रथम खासदार म्हणून निवडून आले. त्यांनीही दोन टर्म उपभोगल्या. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातून दिवंगत लक्ष्मणराव पाटील हेही दोन टर्म खासदार राहिले. या दोन्ही खासदारांचे प्रगती पुस्तक काढल्यास उदयनराजे निश्चितपणे उजवे ठरतील. परंतू सत्तेत असतानाही शरद पवार व पृथ्वीराज चव्हाणांनी सातारा जिल्ह्याला गाजर दाखवण्याचे काम केले. बारामतीचा विकास झाला म्हणजे सातार्याचा होतो, असे होत नाही हे कोणीतरी पवारांना समजून सांगायला हवे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी लोकांच्या भावनेला हात घालून मते जरुर मिळवली. पण विकासाच्या बाबतीत सातारकरांच्या भावनेचा इस्कूट करण्याचे काम पवारांनी केलेले आहे. यामुळेच उदयनराजेंनी भरल्या ताटावरुन उठून 'राष्ट्रवादील्लंघन' केले. उदयनराजेंची पक्षांतराची ही भूमिका अनेकांना पटली नाही. त्यामुळेच उदयनराजेंना पराभवाच्या रुपाने मोठी किंमत चुकवावी लागली आहे. सत्य हे कडवट असते, परंतू ते शाश्वत असते. येणार्या काळामध्ये शिवसेना- राष्ट्रवादी- कॉंग्रेसच्या महाआघाडी रिक्षाला पंक्चर करण्यासाठी भाजपने मास्टरप्लॅन आखला आहे. छत्रपतींच्या सातारच्या आणि कोल्हापुरच्या गादीचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने नेहमीच वापर करुन घेतला आहे. परंतू ज्यावेळी त्यांना काही द्यायची वेळ आली त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने हात वर केलेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सातारच्या गादीचा सन्मान होणार. भाजपा माजी खासदार श्री. छ. उदयनराजेंना राज्यसभेसह केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री करुन छत्रपतींची खरी निष्ठा काय असते, हे दाखवून देणार आहे. शिवसेनेच्या नावात शिव असून चालत नाही, तर त्यांच्याप्रमाणे आपले कार्यही असायला हवे. आपल्या भूमिकेशी प्रतारणा करणार्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी येणार्या काळात भाजपा शिवसेनेवर उदयनास्त्र डागून वचपा काढणार असल्याची खात्रीलायक माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे. त्यामुळे येणार्या काळात ‘मै खडा तो ठाकरे सरकार से बडा’ अशी गर्जना सातार्यातून नक्कीच ऐकायला मिळेल. उदयनराजेंची लोकप्रियता आणि आक्रमकता येणार्या काळामध्ये भाजपच्या कामी येणार आहे. परंतु छत्रपतींच्या नावावर राजकारण करुन मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरेंचा काटा भाजपा छत्रपतींच्या थेट वंशजांकडून काढणार, हे मात्र निश्चित!
शिवाजी विद्यापीठाबरोबर शिवसेनेचाही नामविस्तार करा !
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण व्हावे, ही राज्यातील तमाम जनतेची इच्छा आहे. 18 नोव्हेंबर 1962 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केले होते, तर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मंत्री बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेवून या विद्यापीठाची स्थापना केली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असावे, असा आग्रह तत्कालीन समाजधुरिणांनी धरलेला होता. त्यामुळेच कोल्हापूर येथील विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले होते. परंतू अलिकडेच शिवाजी या नावापुढे छत्रपती शिवाजी महाराज असा नामविस्तार करावा, अशी मागणी झाली. लगोलग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबतचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांना दिले. गेली चार दशके शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करीत आहे. त्यामुळे छत्रपतींच्या नावावर जगणार्या शिवसेनेनेही येत्या काळामध्ये आपल्या पक्षाचा नामविस्तार करुन छत्रपती शिवाजी महाराज सेना असे नाव शिवसेनेला द्यावे, या मागणीला राज्यभरातून जोर वाढत आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |